रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाईची समस्या मोठ्याप्रमाणावर निर्माण झाली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दिवसेंदिवस चारा आणि पाण्याची स्थिती गंभीर होत चाललीये.
337 गावांना 443 टँकरद्वारे पाणीपुरवठा
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 337 गावांना 443 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जनावरांसाठी लागणारा चारा देखील जिल्ह्यातील 11.5 लाख पशुधन जगवण्यासाठी अपुरा पडत आहे. यामुळे गावकरी चिंतेत आहेत.
टँकर मुक्तीसाठी मागील 25 वर्षांपासून सरकारने अनेक योजना आणल्यात मात्र, अजूनही अनेक गावातील पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना गावकऱ्यांना टँकरची वाट पाहत बसावी लागत आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात वार्षिक सरासरी एवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासूनच अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली होती.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ विहिरींचे अधिग्रहण करणे, खोलीकरण करणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा उपायोजनांसाठी ऑक्टोंबर ते जून या 9 महिन्यांच्या कालावधीसाठी 81 कोटी 40 लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 226 विहिरीच्या अधिग्रहणातून 337 गावांची तहान भागविली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.