बीड :- बीड जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र याकडे मुख्यमंत्र्यांना पाहायला वेळ नाही. अतिवृष्टीची मदत जाहीर मात्र अद्याप शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. हे मुख्यमंत्री फक्त बोलघेवडे आहेत. त्यांना आर्यन अन शाहरुखच्या बचवातून वेळ मिळाला असेल तर त्यांनी शेतकरी आत्महत्येकडे लक्ष द्यावं. असा सणसणीत टोला आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
तर या सरकारसह शासनाचा निषेध म्हणून नागरिकांनी दारात काळे झेंडे लावून दिवाळी साजरी करावी. असं आवाहन देखील मेटे यांनी शेतकरी आत्महत्येवरून केलं आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावरून धनंजय मुंडेंसह पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन अन सत्ताधारी पदाधिकाऱ्यांविरोधात चांगलाचं घणाघात केलाय.
ते म्हणाले, की बीड जिल्ह्यात वाढत्या शेतकरी आत्महत्या ही इथल्या पालकमंत्र्यांना, शासनकर्त्यांना प्रशासनाला लाजिरवाणी गोष्ट आहे. या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील किती लोकांना या प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी भेटी दिल्या, ते सांगावे. मुख्यमंत्री अन पालकमंत्री फक्त लोकांना फसवेगिरीच्या घोषणा करत आहेत. त्यामुळं या शासनाला जनाची नाही पण मनाची देखील लाज वाटत नाही. असा घणाघात देखील मेटेंनी यावेळी केला.
आज शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टीने, पीक गेली, शेती गेली, घरेदारे गेली पण अद्याप पंचनामे झाले नाहीत. मुख्यमंत्री अन पालकमंत्री फक्त घोषणा देण्यात मग्न आहे. पालकमंत्री फक्त आमची यंत्रणा कामाला लागली म्हणतात. त्यांची यंत्रणा नेमकी कुठं अन कोणत्या कामासाठी कामाला लागलीय याच उत्तर द्यावं, असा सवाल मेटे यांनी केलाय.
आज जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुणियाने थैमान घातलं आहे. यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांना सरकार मारतंय आणि बीड मधील लोकांना नगरपालिका मारतेय. आज अनेकांची दिवाळी हॉस्पिटलमध्ये आहे. जर अशीच परस्थिती राहिली तर आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.
या बीड जिल्ह्यात अवैध धंद्यांनी हाहा:कार केला आहे. या बीड जिल्ह्यात काय नाही अशी एकही गोष्ट सध्या नाही. हे कमी की काय तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तलवारीने मारामाऱ्या होत आहेत, बलात्कार होत आहेत, हे सगळं सुरू असताना, याला खतपाणी पोलीस विभागातून मिळते की काय ? असा माझा प्रश्न आहे. बीडच्या बनावट दारू कारखान्याला अन परळीतील गांजाच्या कारखान्याला कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय ते चालत नाहीत.
आज 5 ग्राम गांजामुळं देश परेशान आहे, मात्र इथं मुंडेंच्या परळीत 300 किलो गांजा सापडला याची साधी दखल देखील घेतली जात नाही. आज सत्ताधारी पक्षातील अनेक पदाधिकारी क्लब थाटून बसले आहेत. हे सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी आहेत, हे पोलीस प्रशासन डोळे बंद करून बसलंय का ? जिल्ह्यात महिला सुरक्षित नाहीत, गुंडगिरी वाढलीय, पोलिसात तक्रार घेतली जात नाही. त्यामुळं शाहरुख अन आर्यनच्या बचवातून मुख्यमंत्री महोदय तुम्हाला जर वेळ मिळाला, तर हा शेतकरी आत्महत्या करणार नाही.याकडे लक्ष द्या, अनुदान द्या.
आम्ही काही दिवस वाट पाहणार आहोत, हे बंद नाही झालं तर शिवसंग्राम दिवाळी झाली की मोठा मोर्चा काढेल, महाराष्ट्रात आत्महत्येचा विषयी घेऊन जाऊ..आणि येणारं अधिवेशन देखील चालू देणार नाही.असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.