राजेश भोस्तेकर
रायगड : नववर्ष स्वागतावर कोरोना सावट उभे राहिल्याने शासनाने पुन्हा निर्बंध राज्यात लागू केले. त्यामुळे 31 डिसेंबरला नववर्ष (New Year Celebration) स्वागतासाठी पर्यटकांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने समुद्र किनारे हे काहीसे सुनेसुने होते. मात्र शनिवार आणि रविवार सलग सुट्यामुळे दोन दिवस जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरून गेले आहेत. मात्र मौज मस्ती करताना पर्यटकांकडून कोरोना नियमांना पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र किनाऱ्यावर पाहायला मिळत आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोके वर काढल्याने शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाई केली जात आहे. त्यामुळे रात्री नऊ नंतर समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळे ही पर्यटकविना सामसूम दिसत आहेत. 31 डिसेंबर रोजी दरवर्षी समुद्रकिनारी मोठी गर्दी पर्यटकांची असते. मात्र शासनाने निर्बंध लागू केल्याने अनेकांनी यावर्षी रायगडाला (Raigad) नववर्ष साजरे करण्याचे बेत रद्द केले होते. याचा फटका हा हॉटेल व्यवसायिकांनाही बसला होता. मात्र शनिवार रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्याने पर्यटक हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
समुद्रकिनारी पर्यटक घोडा, उंट सफारी, एटीव्ही बाईक, सायकल रायडिंग, वॉटर स्पोर्ट चा आनंद लुटत आहेत. त्याचबरोबर समुद्र स्नानाचाही आनंद घेत आहेत. मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन होतानाही दिसत आहे. अनेक पर्यटक हे मास्क न लावता समुद्रकिनारी सर्रास फिरताना दिसत आहेत. मास्क न लावणाऱ्यावर कारवाईचा बडगाही स्थानिक प्रशासनाकडून उचलला जात आहे. असे असले तरी कोरोना नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र समुद्रकिनारी, पर्यटन स्थळावर पाहायला मिळत आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.