भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
मोदी पंतप्रधान झाल्यापासून रामदास आठवलेंनी ना लोकसभेला जागा लढवली, ना जिंकली. मात्र तरीही त्यांनी मंत्रिपदाची हॅट्रिक मारलीय. त्यामुळे रामदास आठवलेंच्या सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या मंत्रिपदाची चर्चा रंगलीय. तर मंत्रिपद मिळाल्यानंतर रामदास आठवलेंनी मोदींचे आभार मानलेत.
रिपाइंची शकल झाल्यानंतर आठवलेंनी शरद पवारांसोबत आघाडी केली. पवारांनी रामदास आठवलेंना विधानपरिषदेवर संधी देत त्यांच्या गळ्यात थेट समाज कल्याण मंत्रिपदाची माळ टाकली होती. पुढं राज्यातील समीकरण बदलतं गेले आणि त्यानुसार रामदास आठवलेंनी आपली भूमिकाही बदलली. मात्र नेहमीच त्यांनी सत्तेत राहणं पसंत केलं.
रामदास आठवले 2014 मध्ये भाजपसोबत युती केली. मात्र राज्यात एकही जागा लढवली नाही. एनडीएच्या उमेदवारांसाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या निवडणूकीत 41 लाख मतं घेतली होती.
तर यंदाही राज्यात 35 जागा लढवल्या. मात्र त्यांच्या मतांमध्ये घसरण झालीय. मात्र सत्तेच्या राजकारणात आठवलें आंबेडकरी चळवळीतल्या सर्वच पक्षांना वरचढ ठरले.
लोकसभा निवडणूकीत राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यामुळे आगामी काळातील विधानसभा, महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत दलित मतांचा फटका बसू नये, यासाठी भाजपने पुन्हा एकदा रामदास आठवलेंना मंत्रिपद देत सोशल इंजिनियरिंगचा प्रयत्न केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.