Sangli News: उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे सांगली जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे उन्हापासून कोंबड्याचे संरक्षण करण्यासाठी पोल्ट्री धारकांवर चक्क पाणी फवारण्याची वेळ आली आहे.
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय आहेत. विशेषतः विटा खानापूर, मिरज, कवठेमहांकाळ आदी तालुक्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.
विटा शहर परिसरात व खानापूर तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला आहे. तरीही काही पोल्ट्री व्यावसायिक तग धरून आहेत. त्यातच या उन्हाचा परिणाम अंडी उत्पादनावर होऊ लागला आहे. कोंबड्यांना व्हिटामीन सी, कॅल्शियम अशी औषधे द्यावी लागत आहेत. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. त्यामानाने अंड्याला दर मिळत नाहीत. (Latest Marathi News)
अंड्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. दहा दिवसांपूर्वी प्रतिअंडे ४ रुपये ३० पैसे दर होता. त्यानंतर त्यात ५० पैशांची वाढ होऊन ४ रुपये ८० पैसे दर झाला. आज परत दरात घट होऊन ४ रुपये ६० पैसे झाला आहे. खासगी किराणा दुकानदार प्रतिअंडे साडेपाच ते सहा रुपये दराने विक्री करत आहेत. त्यामुळे व्यापारी, खासगी दुकानदार मालामाल होत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक सांगत आहेत.
उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडत आहे आणि अंडी उत्पादनही घटत आहे. या वाढत्या उन्हामुळे कोंबड्यांना व्हिटामिन सी, कॅल्शियमसारखी औषधे द्यावी लागत आहेत. उन्हापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये गारवा निर्माण करावा लागत आहे. फवारणीद्वारे कोंबड्यानं पाणी फवारले जात आहे.
काही पोल्ट्रीधारकांनी स्प्रिंक्लरची शेडमध्ये सोय केली आहे. त्यात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा त्रास पोल्ट्रिधारकांना होत आहे. या सर्वावर मात करत पोल्ट्री व्यवसाय सुरू आहे. तर महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अशीही मागणी पोल्ट्रिधारकांकडून होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.