Breaking : महाविकास आघाडी सोबत गेल्याचा पश्चाताप होतोय : राजू शेट्टी

पियुष गोयल यांनी FRP संदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहलेले पत्र म्हणजे अब्राहम लिंकन यांनी शाळेच्या हेडमास्तर ला लिहलेले पत्र नाही, त्यामुळे या पत्राला फार महत्व नाही.
महाविकास आघाडी सोबत गेल्याचा पश्चाताप होतोय : राजू शेट्टी
महाविकास आघाडी सोबत गेल्याचा पश्चाताप होतोय : राजू शेट्टी SaamTvNews

कोल्हापूर : जयसिंगपुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद पार पडली. या परिषदेस संबोधित करताना स्वाभिमानीचे प्रमुख माजी खासदार राजू शेतीची यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह केंद्रावर जोरदार निशाणा साधला. दिवाळीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी शेतकऱयांना केले आहे.

ऊस परिषदेतील ठराव :

1) यावर्षी ऊसाला 3300 रुपये उचल द्यावी

या उचलीतील एफआरपी ची रक्कम विनाकपात द्यावी आणि उर्वरित रक्कम मार्च पर्यंत द्यावी

२) केंद्र सरकारने एफआरपी पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांना आयकर लावू नये

3) गेल्या हंगामातील थकीत एफआरपी 15% व्याजासह द्यावी

4) नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते ते 50 हजार द्यावेत.

5) शेती पंपाची वीज 12 तास द्यावी

6) महापुरात नुकसान झालेल्या शेतीला गुंठ्याला 950 रुपये द्यावेत, पुरात बुडालेल्या ऊसाला अगोदर तोड द्यावी.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, गेली 19 वर्ष याच मैदानात ऊस परिषदा घेतल्या आणि दर मागून घेतला. पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज होतं आणि माझी दाढी काळी होती. आता दाढी पांढरी झाली आहे, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहेत, हे फार मोठं दुर्दैव आहे. महाविकास आघाडीचे सरकार आपणच आणलं आहे. महाविकास आघाडीच सरकार आणण्यासाठी आमचाही खारीचा वाटा होता. शरद पवार यांनी पावसात भिजत भिजत हे सरकार आणलं. त्यामुळे महापुराची जाण यांना असेल असं वाटलं होतं. पण भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते माझ्यावर विश्वास ठेवा मी फसवणार नाही. मात्र, आंदोलने करून, पायी यात्रा काढून, जलसमाधी आंदोलन करून अजूनही शेतकऱयांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत.

साखरेला चांगले भाव आले असताना एफआरपी चे तुकडे करण्याचं कारस्थान रचण्यात आलं आहे. पियुष गोयल यांनी FRP संदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लिहलेले पत्र म्हणजे अब्राहम लिंकन यांनी शाळेच्या हेडमास्तर ला लिहलेले पत्र नाही, त्यामुळे या पत्राला फार महत्व नाही. केंद्राच्या सचिवानी या बाबत एक पत्र किंवा प्रेस नोट द्यायला हवी होती.

महाविकास आघाडी सोबत गेल्याचा पश्चाताप होतोय : राजू शेट्टी
माझ्या वरील आरोप सिद्ध करा; रवी राणा यांचे यशोमती ठाकूर यांना खुले चॅलेंज!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजप नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीबाबत :

आज दिल्लीला काही मंडळी गेली आहेत. ते म्हणतात आम्ही कारखानदारांचे प्रश्न सोडवणार त्यांचेच प्रश्न सोडावा त्यांनाच कमी पडलंय, असा टोला शेट्टी यांनी भाजप नेत्यांच्या दिल्ली भेटीवर लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक :

पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांच हित जपलं. आता महाविकास आघाडी सरकारने ऊस दर नियंत्रण समितीवर असे सदस्य नेमले आहेत की ते आमदारापुढे तोंडही उघडत नाहीत. कृषीमूल्य आयोगाला पाच सदस्य असतात त्यातील दोनच सदस्य सध्या आहेत. त्यामुळे कृषि मुल्य आयोगाची वाट लावली आहेत. एफआरपी बाबत निर्णय केंद्राला कळवताना स्वाभिमानीचे मत घ्यावे असे वाटले नाही का? असा प्रश्न शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

यावेळी शरद पवार यांच्यावर देखील शेट्टी यांनी टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला बळ दिलं ते शेतकऱ्यांनी. पण ज्यावेळी आमचा प्रश्न आला तेव्हा पवारसाहेब तुम्ही करखानदारांची बाजू घेतली. मात्र, जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली तर राष्ट्रवादी राहणार नाही. \

आयकर व ईडीच्या छाप्यांबाबत :

असेच आयकर चे आणि ईडीचे छापे पडले तर सगळे उंदीर पळून जातील, असे शेट्टी यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे.

एक रकमी एफआरपी दिलीतर कारखान्याची अवस्था गिरिणी सारखी होईल असं शरद पवार म्हणतात. पण एक रकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर मंत्री असताना तुम्ही च सह्या केल्या होत्या. पवारसाहेब मोदी तुमचं ऐकतात, FRP चे तुकडे पाडायचं तुम्ही च मोदींच्या कानात सांगितलं असणार, असा घणाघाती आरोप शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

महाविकास आघाडीन वीज ग्राहकांना फसवलं, पुरग्रस्ताना फसवलं, ऊस उत्पादकाना फसवलं त्यामुळे महाविकास आघाडी बरोबर राहायचं की नाही याचा निर्णय घेणार असून, आता कुणाच्या दारात जाणार नाही. लवकरच वर्तमानपत्रातूनच आमचा निर्णय कळवू, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ऊसाला टनाला 3300 रुपये उचल द्यावी, एक रकमी FRP द्यावी आणि उर्वरित रक्कम मार्च पर्यंत द्यावी,अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com