
मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले पण आता त्यांनी युती करावी अशी अनेकांची इच्छा आहे. दोन्ही पक्षांकडून त्यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे देखील दिसत आहे पण अद्याप त्याबाबत दोन्ही पक्षांकडून काहीच पाऊले उचलली गेली नाहीत. अशामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकमधून युतीचे थेट संकेत देण्यात आले आहेत. आता संभ्रम नको, दोन्ही ठाकरेंची युती होणं गरजेचे आहे तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल, असे सामानाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे.
'संभ्रम नको, युती गरजेची' अशा ठाम शब्दांत ठाकरे सेनेने आपल्या मुखपत्रातून आगामी राजकारणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. विरोधकांमध्ये गोंधळ वाढू नये, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून एकत्र येण्याची गरज ठाकरे गटाने अधोरेखित केली आहे. दिल्ली, महाराष्ट्राचे सत्ताधारी ठाकरेंची युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील, ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना आहे, असं देखील सामनातून रोखठोक सांगण्यात आले आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या रोखठोकमध्ये असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे. मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी व्यापारी भाजपला प्रेम नाही. मराठी माणसांशी लढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतल्या गुंड टोळ्यांना भाजपमध्ये समाविष्ट केले, हे चित्र काय सांगते?'
रोखठोकमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील.' ठाकरेंच्या युतीची सर्वात जास्त भीती एकनाथ शिंदेंना असल्याचे सांगत रोखठोकमधून एकनाथ शिंदेना टोला लगावण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांची भेट घेतली यावर रोखठोकमध्ये असे लिहिले की, 'मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते. ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटले.
तसंच, 'महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.' यावर अमित शहा यांनी विचारले, 'काय करायचे?' त्यावर शिंदे म्हणाले, 'मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.' शहा - शिंदे यांच्यात ही चर्चा झाली आणि अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे.', असे रोखठोकमध्ये सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.