जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आपल्या आंदोलनाची स्टाइल काहीशी बदलली आहे. ते आता मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी शनिवारी माध्यमांसोबत संवाद साधतांना सांगितलं. यावेळी त्यांनी आंतरवाली सराटीसह मुंबईमध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, दस्तावेज अभ्यासकाची नियुक्ती करावी तसेच गॅझेट लागू करावे.
एसीबीसीच्या प्रकरणाची दखल घेणे आणि अजून काही मागण्या आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांच्यामार्फत मी उपोषणाला बसल्यावर दिले होते. पण आता उपोषण सोडून १२ ते १३ दिवस उलटले असून, अद्याप एकही मागणी मान्य केलेली नाहीये, असं जरांगे म्हणाले.
सरकारपेक्षा मराठा मोठा आहे हे सरकारला एकदा दाखवावंच लागेल. अंधारात एक बोलता आणि उजेडात दुसरं करतात. माझ्याशी गद्दारी करू नका. मराठ्यांशिवाय तुमचं पानही हलू शकत नाही. सत्ता आल्यापासून मी सन्मानाने बोलत होतो, पण तुम्ही आमच्या लेकराबाळांच्या जीवाशी खेळत आहात! अशा आक्रमक शब्दांत जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर तीव्र टीका केली.
सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेटमध्ये एकही मागणी मान्य झाली नाही. आता होणाऱ्या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये काय होईल हे माहिती नाही. आता आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर आमचा लढा उभा करणार आहोत. पण त्याआधी १५ फेब्रुवारीपासून आम्ही आंतरवाली सराटीत बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत. राज्यातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात हे आंदोलन उभं राहणार आहे. शांततेत आंदोलन कसे केले जाते आता हे मुख्यमंत्र्यांना कळेल, असा तीव्र इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.