मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. जालन्यात आंदोलकांवर लाठीमार केल्याने मराठा आंदोलन चिखळलंय. लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. अशात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत जहरी टीका केली आहे. (Latest Maharashtra Political News)
"सरकारला मस्ती आली असून आपणच आजीवन सत्तेवर आहोत अशा आविर्भावात वागत आहेत. आपल्याकडे ईडी, सीबीआय असल्याने आपले कुणीच काही करू शकत नाही असे यांना वाटते. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करताना सरकारची हीच मनमानी दिसून आली.,"असा घणाघात करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलीय.
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राहुरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह शेकडो मराठा आंदोलक यावेळी उपस्थित होते.
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यसरकारवर निशाणा साधताना सरकारला मस्ती आली असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय. मराठ्यांना आरक्षण कसे मिळेल या तांत्रिक गोष्टीत मला पडायचे नाही मात्र आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज निषेधार्ह आहे, असं ते म्हणाले.
त्यांनी विरोधात असताना काहीही केलं तरी चालते मात्र आम्ही केलं तर राजकारण केल्याचा आरोप सत्ताधारी करतात. आमच्या माता भगिनींचे रक्त सांडले त्याचा आम्ही निषेध करायचा नाही का? धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं? असे प्रश्न उपस्थित करत सरकारची मग्रुरी आता कृतीतून उघड व्हायला लागल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.