राज्यातील महापालिका निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होऊ शकतात.
१५ किंवा १६ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता.
१४ डिसेंबरपर्यंत सर्व मनपांच्या मतदार याद्या जाहीर होणार.
नागपूर अधिवेशनानंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम वेळापत्रक जाहीर होणार.
When will Maharashtra municipal corporation elections be held : ८ वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पण त्यालाही ग्रहण लागले, कारण जिल्हा परिषद आणि मनपा आरक्षणामुळे आयोगाचे वेळापत्रक कोलमडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील सर्वा निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार? याकडे कार्यकर्ते अन् महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयोगाकडून जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुका घेण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठीही तारखांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते.
सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नागपूरमधील राजकीय वातावरण तापलेय. अधिवेशनावर निवडणुकीचाही प्रभाव पडल्याचे दिसतेय. विरोधक आक्रमक झालेत, तर सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या आठवड्यात अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत राज्यात निवडणुकींची घोषणा होऊ शकते. २९ महानगरपालिकेसाठी १५ किंवा १६ तारखेंपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. उर्वरित नगरपरिषद-नगरपंचातीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २१ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच आयोगाकडून पुढच्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा करण्यात येऊ शकते. त्यासाठी आयोगाकडून सर्व चाचपणी पूर्ण झाली आहे. १४ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व मनपाच्या वॉर्डातील मतदार याद्या जाहीर होतील. त्यानंतर पुढील २ ते ३ दिवसांत मनपा निवडणुकीची घोषणा केली जाईल, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
मुबंई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि नागपूरसह राज्यातील महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुका एकत्रित होणार आहे. त्यासाठी राज्यात पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू शकते, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय. आयोगाकडून महापालिका निवडणुका अखेरच्या टप्प्यात घेण्यात येणार होत्या. त्याआधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. पण २० जिल्हा परिषदेतील आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेल्याने कोर्टाकडून ताशोरे ओढण्यात आले. त्यामुळे आता मनपा निवडणुका आधी घेण्यात येणार आहेत. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होतील. सत्ताधारी अन् विरोधकांकडून मनपा निवडणुकीची तयारी सुरू कऱण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या मनपामध्ये इच्छुकांचे अर्ज मागण्यात आले आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील महत्त्वाच्या पालिकेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कुणाची सत्ता येणार? याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.