जळगाव : हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस होत आहे. यात जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पाऊस झाला आहे. शनिवारी रावेर तालुक्यात झालेल्या गारपिटीनंतर आज दुपारी चोपडा तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह जोरदार पावसाला सुरवात झाली. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
राज्यातील अनेक भागात दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाने झोडपले होते. वादळी वाऱ्यासह गारपीट व जोरदार पाऊस झाला होता. यानंतर साधारण आठवडाभर तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान हवामान विभागाकडून पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार नांदेड, जळगाव जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली आहे.
चोपडा तालुक्याला झोडपले
दरम्यान आज सकाळी कडक उन्हाचे चटके जाणवत असताना आज दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. तर चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा शिवारात गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
रावेर तालुक्यात गारपिटीने ७३३ शेतकऱ्यांना फटका
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीमुळे १९ गावांमधील ७३३ शेतकऱ्यांचे सुमारे ५०९ हेक्टरवर केळीचे नुकसान झाले आहे. यात रावेर शहर आणि परिसरातील ३०० हेक्टरवरील केळी पिकाचा समावेश आहे. नुकसान झालेल्या केळीत ऐन कापणीवर आलेल्या केळीचा समावेश आहे. कापणीला आलेल्या घडांवर गारांचा वर्षाव झाल्याने केळी काळी पडणार असून, हे परिणाम आज पासून दिसायला सुरुवात होतील. दरम्यान शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी; यासाठी पंचनाम्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.