बालाजी सुरवसे, साम टीव्ही धाराशिव
महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आता आगामी काळातही शिंदेच मुख्यमंत्री असतील, असा मोठा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. आम्हीच खरी शिवसेना असून उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महायुतीतील घटक पक्षाचे नेते राज्यातील मतदारसंघ पिंजून काढत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी देखील प्रचाराला सुरूवात केली आहे.
आज शनिवारी, तानाजी सावंत धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी सावंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेला शब्द पाळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं सावंत सावंत म्हणाले.
आगामी काळातही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) राहणार, असंही सावंत म्हणाले. २०२४ आणि २०२९ पर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडेच महाराष्ट्राचं नेतृत्व असणार, असा मोठा दावाही तानाजी सावंत यांनी माध्यमांसोबत बोलताना केला. त्यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेला दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फेटाळला आहे. कुणीही क्रेडिट घ्यावे यासाठी उठाव नव्हता. फक्त तानाजी सावंत यांच्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, तर सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले आहेत, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांना आमच्या बंडाची कल्पना होती. त्यांनी त्याबद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. मात्र, काही चमच्यांनी त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यामुळेच त्यांची मोठी धावपळ झाली, असंही संजय शिरसाट म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.