नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चाचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये तरूणाई रस्त्यावर उतरली.
राजधानी दिल्लीप्रमाणेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही सीजेपीच्या तरूण समर्थकांनी दादरच्या चैत्यभूमी परिसरात जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाची आधीच खबर लागल्यामुळे सरकारनं जमाबबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. मात्र आंदोलकांनी गनिमी कावा करत टप्प्या टप्प्यानं आंदोलन केल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. संतप्त आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पुणे
पुण्यातही तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तरुणांनी हातात मोठ मोठे बॅनर घेतले होते. पुण्यातल्या आंबेडकर पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुणांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे पुणे पोलिसांना आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
ठाणे
सीजेपी आणि सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यातही आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातल्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पथ नाट्य माध्यामातून सरकारचा निषेध केला.
भिवंडी
भिवंडीतही दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुणाई एकत्र आली. भिवंडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी आणि नागरिकांनी भर पावसात जोरदार आंदोलन केलं.
नाशिक
नाशिमध्येही सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी नाशिककरांनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
नागपूर
नागपुरातही दिल्लीतल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. नागपूरात आंदोलकांनी मोर्चा काढला होता. शहरातल्या व्हरायटी चौक ते आरबीआय चौक असा लाँग मार्च काढण्यात आला होता.
कोल्हापूर
वेगवेगळ्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या चळवळ्या कोल्हापूरकरांनीही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मविआच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभाग घेतला. पोलिसांनी मोठ्या संख्येनं आंदोलकांना ताब्यात घेतलं.
बीड
जंतर-मंतरवरील आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केलं. प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
धुळे
सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचे धुळ्यात संतप्त पडसाद उमटले आहेत. जिल्ह्यात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जोरदार निदर्शने केली.
दिल्लीतल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. त्यामुळे जोपर्यंत दिल्लीत आंदोलन सुरू राहणार तोपर्यंत राज्यातही ठिकठिकाणी आंदोलनाचं लोण पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारनं खबरदारी म्हणून मुंबईत 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश दिलेत. तर पुण्यातही पुढचे काही जमावबंदी लागू केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.