
मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढत आंदोलन केलं होतं. त्याच निषेधार्थ आज मनसेच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
पोलिसांनी मोर्चा परवानगीशिवाय काढल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी का देण्यात आली नाही? याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलं की, मनसेच्या मोर्चाला परवानगी का देण्यात आली नाही? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले,'मनसेच्या मोर्चाबाबत पोलीस आयुक्तांना विचारलं, मोर्चाला परवानगी का देण्यात आली नाही? कारण कुणीही मोर्चाला परवानगी मागितली तर, आपण परवानगी देतो. पण पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, मनसेच्या मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा सुरू होती. तेव्हा मनसेचे नेते जाणीवपूर्वक अशा मार्गाची मागणी करत होते, जेणेकरून संघर्ष निर्माण होईल', असं फडणवीस म्हणाले.
'तसेच पोलिसांकडे अशी माहिती आली की, काही वेगळा प्रकार घडू शकतो. त्यामुळे पोलिसांनी, नेहमीच्या मार्गावरून मोर्चा काढण्यास सांगितले. मात्र, ज्या मार्गावरून मनसैनिक मोर्चा काढणार होते. त्या मार्गावरून मोर्चा काढू नका, असं सांगण्यात आलं. पोलिसांनी दिलेला मार्ग मनसैनिकांनी नाकारला, असं पोलीस आयुक्तांनी माहिती दिली', असं फडणवीस म्हणाले.
'मनसेच काय.. कोणत्याही पक्षाला मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर मिळेल. मात्र, मोर्चासाठी हाच मार्ग हवा, ही मागणी करत असाल तर, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल. असा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असेल तर ते योग्य नाही.. शेवटी आपल्या सर्वांना एकाच राज्यात राहायचं आहे', असंही फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.