Chhatrapati Sambhajinagar News: एकीकडे राज्य सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भिवधानोरा गावात रस्ता नसल्याने प्राथमिक शिक्षणासाठी लहान लहान मुलांना मोठा धोका पत्करून शाळेत पोहोचावे लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. जायकवाडीच्या एक किमी बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून मुलांना शाळा गाठावी लागते.
पाण्यातील मोठे विषारी साप तराफ्याकडे येऊ नये, म्हणून ही कोवळी मुले काठीने त्यांना ढकलतात. नदीपात्रातून बाहेर पडल्यानंतर ही मुले घनदाट गवत, एक फूट पाण्यातून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करत शाळा गाठतात. या बिकट वाटेत शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी पाण्यात टाकल्या आहेत, त्याचाही धोका मुलांना आहे.
एवढ्या संकटाना पार करून मुलांना शाळेत जावे लागते. आणि तेवढेच संकट पार करून पुन्हा घर गाठावे लागते. लेकरू शाळेतून घरी येईपर्यंत आई वडिलांना मुलांची चिंता सतावत असते. मात्र मुलांच्या भविष्यासाठी आई वडिलांना नाईलाजास्तव हा धोका पत्करत मुलांना शाळेत पाठवावे लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.