छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलवली आहे. उद्या सकाळी ११ वाजता वांद्रे एमईटी येथे ही बैठक होणार आहे. भुजबळ यांची पक्षांतर्गत नाराजी, मराठा, ओबीसी आरक्षण या विषयावर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.
मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. ते लवकरच राजकीय पक्ष संघटना काढणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. संजय पांडे हे उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्यास देखील इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना निवडणूक लढू नये, यासाठी विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनी माघार घेतली. मात्र आता लवकरच राजकीय पक्षाची संघटना काढून ते विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत.
अभिनेता सलमान खानाला धमकी देणाऱ्या आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीला आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपी बनवारीलाल गुजराला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. आरोपीने सलमानला धमकी देत यू-युट्युबवर व्हिडीओ पोस्ट केला होता.
वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मतदार संघातील कामांचा आढावा घेतला तसेच शिवसेनेच्या शाखेला भेट देखील दिली. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळत फलंदाजी देखील केली.
सरकारमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले. अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या परस्पर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी हा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांना भेटून यासंदर्भात जाब विचारणार आहेत. कर्मचारी नसल्याने महामंडळाचे कामकाज ठप्प होणार आहे. महामंडळ अडचणीत आणण्याचं कामं व्यसथापकीय संचालक कुणाच्या सांगण्यावरून करतात असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिले. 19 जूनपासून सुरु होणारी पोलिस भरती मैदानी प्रक्रिया पावसाळ्या अभावी पुढे ढकलण्याची या पत्रात मागणी केली. पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने उमेदवारांना मैदानी चाचणी देणे कठीण जाणार असल्याने पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली.
Jalana News: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडून पाण्याचा त्याग
शासनाचा निषेध म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आजपासून पाणी देखील सोडलं. शासनाचा निषेध म्हणून मी पाणी सोडलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडून पाण्याचा त्याग. सरकार कडून दखल घेतली जात नाही तोवर उपोषणात आजपासून पाणी देखील घेणार नाही, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. आत्महत्या करू नका, तर मला लढण्यासाठी बळ द्या, असे समर्थकांना आवाहन केले आहे. जर आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले. तसंच, शंभर दिवस द्या हे चित्र पालटून टाकू, असे देखील त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेबांच्या आशिर्वादाने, कृपेने आपल्याला तिसर्यांदा शपथ घेण्यास मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्यात आमचा ध्यास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका मांडल्या होत्या, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करा, असे त्यांचे आव्हान होते. अगदी त्याप्रमाणे सुरूवातीच्या काळापासून ते रिपब्लिकन पक्षापर्यंत आपले काम सुरू आहे आणि त्यामुळेच बाबासाहेबांच्या आशिर्वादामुळेच जे जे कार्यकर्ते. माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणून मला ही संधी मिळाली आहे त्याबद्धल मी नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करतो,असं रामदास आठवले म्हणाले.
वर्धा शहरात 150 इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. नगर परिषदेकडून जीर्ण इमारतींचा सर्व्हे करण्यात आलाय. पावसाळ्यात काळजी घेण्यासाठी इमारत मालकांना नोटीस दिली जाणार आहे. धोकादायक इमारती पाडण्यासाठीही नगर परिषदेकडून पाऊले उचलली जाणार आहेत.
येत्या 18 जून रोजी राज्यामध्ये ग्रामविकास विभागामार्फत ग्रामसेवक या पदासाठी परीक्षा होत आहे. उमेदवारांनी प्रत्येकी १ हजार रुपये शुल्क भरून आवेदन पत्र दाखल केले होते. तसेच जवळचे परीक्षा केंद्र देखील निवडली होती. मात्र, ती परीक्षा केंद्र न देता विद्यार्थ्यांना दूरवरील परीक्षा केंद्र देण्यात आली.
त्याच दिवशी नेट यूजीसीची परीक्षाही होणार असल्याने उमेदवारांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामसेवक पदासाठीच्या परीक्षेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी मंत्र गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.
वर्धा येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म क्रमांक ४ वरील स्टॉलला रविवारी पहाचे ४ वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचं कळताच नागरिकांची मोठी धावपळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून सलमानला मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक करण्यात आली. बनवारीलाल गुजर (वय २५) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. बनवारीलालने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख करत सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलीस आरोपीला घेऊन काही तासांतच मुंबईत दाखल होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे याठिकाणी अनेक कुटुंब वास्तव्यास होती तर अनेकांचे व्यवसाय सुरू होते. अतिक्रमणाचा विषय गेल्या 33 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवण्यात आली. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संसार उघड्यावर आल्याने अनेकांना गहिवरून आले होते.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला तात्काळ गती द्यावी, अशी मागणी आरपीआय खरात पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मुंबई येथील इंदू मिलमध्ये व्हावं, यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन केलं होतं. याचमुळे इंदू मिलची जागा मिळाली होती, असं सचिन खरात म्हणाले.
2015 साली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी इंदू मिल येथे या स्मारकाचे भूमिपूजन केलं आणि काम सुरू करण्यात आले. परंतु काम सुरू होऊन नऊ वर्ष होताना दिसत आहेत. तरीसुद्धा आज पर्यंत काम पूर्ण झालेले दिसत नाही, अशी नाराजी खरात यांनी बोलून दाखवली.
आता तर समजत आहे की, हे काम पूर्णपणे संथगतीने होताना दिसत आहे. या कामाला लागणारे जी साधनं आहे, ती सुद्धा मिळताना दिसत नाही. त्यामुळे तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या स्मारकाच्या कामाला गती द्यावी अशी आमची मागणी असल्याचं सचिन खरात म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी, या मागणीवर ठाम असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज सकाळी त्यांची काहीशी तब्येत खालवल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. यावेळी हाके यांचा बीपी वाढला असून त्यांच्या काही चाचण्या करण्याचं आवश्यक असल्याचं डॉक्टरने सांगितले, याशिवाय एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील महत्वाचं असल्याचं तपासणी केलेल्या डॉक्टरांनी सांगितलंय.
सोलापुरातील मोदी सम्शानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियांश वाघमारे असे 10 महिन्यांचा मृत मुलाचे नाव आहे. खेळताना इजा झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या प्रियांशचा 14 जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यानंतर त्याच्यावर मोदी सम्शानभूमीत अंत्यविधी पार पडले, आज तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी केवळ खड्डा आढळून आला. दरम्यान या विरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली असून पोलीस घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले आहेत.
ठाण्यातील कोपरी परिसरातील मीठ बंदर रोडवरील श्रमदान या इमारतीमध्ये घराचा स्लॅब कोसळून तीन जण किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सदरचा इमारत 35 वर्ष जुनी आहे. इमारतीला तडे गेल्यामुळे रहिवाशी यांना तात्पुरत्या स्वरुपात इतर हलवण्यात आले आहे. या इमारतीमध्ये 20 सदनिका आहेत.
नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या स्टोनक्वारीच्या पाण्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. पाचही मित्र अल्पवयीन होते, मात्र पोहत असताना मस्तीमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला. त्यामुळे बुडून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. तुर्भे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चारही मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केलाय.
पुणे तिथं काय उणे हे नेहेमीच म्हटल जातं, याची प्रचिती ही विविध माध्यमातून अनेकवेळा येतेच. अश्यातच पुण्यातील डीपी रस्त्यावर असलेल्या नामांकित सोसायटीने सोसायटीच्या जागेत खवय्यांचा होत असलेल्या अतिक्रमणमुळे चक्क सोसायटीच्या मोकळ्या जागेवरच बाऊन्सर नेमले आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना सायंकाळी ६ वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेसाठी तब्बल सात लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी आज ठाण्यात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. ठाण्याच्या हॅाटेल टीप टॅाप प्लाझामध्ये सायंकाळी ५ वाजता मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 टक्क्याने वाढ झाली असून या धरणाचा सद्यस्थितीला पाणी साठा 5.65% इतका झाला आहे. यंदा पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे परंतु मराठवाड्यातील बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्पात हवा तसा पाणीसाठा झालेला नाही.
त्यामुळे मराठवाड्यातील धरणांच्या पाणी पातळीत केवळ 0.72% ने वाढ झाली. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्यान अनेक छोटी मोठी धरणे कोरडी ठाक झाली. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मात्र आज पावसाळा सुरू झाला असला तरीही अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय.
जालना जिल्ह्यातील नेर येथे शेतीच्या वादातून कुऱ्हाड व कोयत्याने वार करून एका 38 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना घडली. संतोष किसन उफाड असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार शेतीच्या जुन्या वादातून हा खून झाला आहे.दरम्यान या संदर्भात जालन्यातील मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित सात आरोपींना अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
जालना जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली .या पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला असून तब्बल अडीच लाख हेक्टर वरील पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे ६ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्र आहे.
आतापर्यंत २ लाख २९ हजार ९३९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान काही भागात आणखी दमदार पाऊस होण्याची आवश्यकता असून त्यानंतर पेरणीला सुरुवात करता येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४१ हजार शेतकरी दुष्काळी अनुदानापासन वंचित आहेत. केवायसी केलेली असतानाही त्यांना दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 31 ऑक्टोबर रोजी शासनाने 40 तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या होत्या.
यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, वाशी आणि धाराशिव या तीन तालुक्याचा समावेश आहे. यामध्ये 1 लाख 54 हजार 259 शेतकऱ्यांना 208 कोटी 50 लाख अनुदान मंजूर झाले होते. यातील 41 हजार शेतकरी निधी नसल्याने केवायसी करुन ही दुष्काळी अनुदानापासुन वंचित आहेत. त्यामुळे हे अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचपीर वाडी फाटा शिवारात सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एका कारचा अपघात झालाय. या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आलंय. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याी माहिती आहे. अपघातातील सर्वजण हे गुजरात राज्यातील रहिवासी आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.