
कोल्हापूरमध्ये अखेर उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होणार आहे.
१८ ऑगस्टपासून ही व्यवस्था कार्यान्वित होईल.
सर्किट बेंच कोल्हापूरसह ६ जिल्ह्यांसाठी असेल.
५१ वर्षांच्या जनआंदोलनानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र शुक्रवारी प्रकाशित करण्यात आले आहे. १८ ऑगस्टपासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल. कोल्हापूरकरांच्या ५१ वर्षांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. मुंबई हायकोर्टात खटले दाखल असलेल्या हजारो पक्षकारांना दिलासा मिळालेला आहे. या लढ्याला 1974 मध्ये सर्वप्रथम प्रारंभ झाला होता, तब्बल ५१ वर्षानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या लढ्याला यश मिळाले आहे.
कोल्हापूर, सोलापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. यासाठी मागील ५० वर्षांपासून लढा चालला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड मिळाली आहे. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होणार असल्याची घोषणा होताच, सहा जिल्ह्यातील नागरिक अन् वकिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
सर्किट बेंच हे उच्च न्यायालयाचे एक उप-केंद्र असते. उच्च न्यायालयापासून दूर असलेल्या लोकांसाठी भौगोलिक क्षेत्रात स्थापन केले जाते. यामुळे त्या क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवणे सोयीचे आणि जलद होते. सर्किट बेंचला मान्यता देण्याची प्रक्रिया ही कायदेशीर, प्रशासकीय आणि राजकीय विचारांवर आधारित असते. सर्किट बेंच स्थापन करण्याची मागणी प्रामुख्याने त्या भागातील लोकसंख्या, भौगोलिक अंतर आणि न्यायालयीन सुविधांचा अभाव यावर आधारित असते.
कोल्हापुरात मुंबई हायकोर्टचे बेंच आल्यामुळे सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांचे पैसे आणि वेळ वाचणार आहे. कोल्हापूरसह सहाही जिल्ह्यातील गेली अनेक वर्ष रखडलेली खटले सोडवण्यास मदत होणार आहे. पक्षकरांना करावा लागणारा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च आणि मुंबईतील हायकोर्टातील वकिलांची भरमसाठ फी यापासून ही सुटका होणार आहे.
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात जाहीर झाल्याचे समजताच शुक्रवारी रात्री वकिलांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून एकच जल्लोष केला. वकिलांसह त्यांच्या संघटनांनी न्याय संकुल परिसरात तर विविध संघटनांनी शिवाजी चौकात रस्त्यावर उतरून जल्लोषात सहभाग घेतला. सर्किट बेंच संदर्भातील अधिसूचना काल सायंकाळी जाहीर झाली. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या वकील आणि पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई हायकोर्टाचा सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे कोल्हापुरात जल्लोष सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने या मागणीसाठी अनेक वर्ष पाठपुरावा केल्याने कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक हे स्वतः या जल्लोषात सहभागी होऊन त्यांनी कोल्हापूरकरांना साखर पेढे भरवले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील पक्षकारांना आणि वकिलांना या सर्किट बेंचचा मोठा फायदा होणार आहे. गेली 25 वर्षाहून अधिक काळ भाजप आणि गेली दहा वर्षे महायुती कोल्हापूरला हायकोर्टचे सर्किट बेंच मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. या प्रयत्नाला अखेर यश आल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.