मुंबई : राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह १६ बंडाखोर आमदारांच्या निलंबनाविषयी केलेल्या याचिकेवर अद्यापही सुनावणी न झाल्याने शिवसेना (shivsena) अजूनही निकालाच्या प्रतिक्षेत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. राऊत यांना अशाच प्रकारे बोलायचे असते. त्यांना कुणीही गांभिर्याने घेत नाही, असं म्हणत दरेकर यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.
प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हाही मंत्रिमंडळ विस्तार करु शकतात. जे कायद्याला योग्य वाटतं तेच होत असतं. विरोधकांचे बोलणे हे न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि याचा काहीही संबंध नाही. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला दिलासा दिला आहे.महाविकस आघाडी सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे 165 लोकांनी शिंदे सरकार पाठींबा दिला आहे. स्वतःच्या बाजूने निकाल लागला तर कोर्टाच्या निर्णयाचा आनंद व्यक्त करायचा. तसं झालं नाही तर कोर्टावर दबाव आहे, असे बोलायचे.
तसेच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, आदिवासींचा सन्मान होईल यासाठी राजकारणाच्या बाहेर जाऊन विचार करून समर्थन दिलं पाहिजे. शिवसेना खासदार यांच्या मनात देखील हीच भावना आहे. कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. लोकशाहीत जनभावना महत्वाची असते. देशासमोर आदर्श निर्माण करण्याची संधी नियतीने दिली आहे. राष्ट्रपतीपद देऊन आदिवासींचा सन्मान केला जात आहे.
दरेकर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत बोलताना पुढे म्हणाले, पक्षामध्ये असे चढउतार येत असतात, त्यामुळे पक्ष बांधणीसाठी यात्रा काढणे स्वाभाविकच आहे.संजय राऊत सामनातून काहीही लिहितात. संजय राऊत यांचे मिशन अजून पूर्ण झालेले नाही. शिवसेना समूळ नष्ट करायची आहे का आणि शरद पवार यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे की काय ? असा सवाल उपस्थित करुन दरेकरांनी राऊतांना टोला लगावला. तसेच मेट्रो कारशेड विरोधात होत असलेल्या आंदोलनाबाबत दरेकर म्हणाले, मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रो महत्वाची आहे. मुंबईकराच्या हितासाठी सरकार हा प्रकल्प करत आहे. आता यापुढे एकही झाड तोडायचे नाही, मग विषय येतो कुठे ? पण केवळ जाणीवपूर्वक विषय करायचं असे सुरू आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.