
Akshaya Tritiya 2025: बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पीक परिस्थिती, पाऊस तसेच सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय, संरक्षण परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. तर भाकित उद्या १ मे ला पहाटे वर्तविण्यात येणार आहे.
पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीवर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या घटमांडणीचे भाकीत उद्या म्हणजे १ मे रोजी सूर्योदयापूर्वी भाकित सांगितले जाईल. यामुळे सामान्य जनतेत मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. हे भाकित ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी, राजकीय नेते, व्यापारी यांच्यासह गावकरी येतात.
जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावामध्ये दरवर्षी घटमांडणी केली जाते त्यानंतर भविष्य वर्तवले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून वाघ परिवार परंपरेनुसार घटमांडणी करतात आणि भाकित सांगतात. भेंडवळच्या वाघ कुटुंबाने सुरू केलेली ही परंपरा सध्या त्यांचे वशंज चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू ठेवली आहे. घटमांडणीच्या दुसऱ्या दिवशी वर्तवलेल्या भाकिताला खूप महत्व असते. या घटमांडणीतून जे भाकित सांगितले जाते त्यामध्ये शेती, पीक, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, युद्ध, महापूर आणि राजकीय परिस्थिती या सारख्या महत्वाच्या विषयांवर अंदाज वर्तवला जातो.
भेंडवळमध्ये शेतीविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने भाकित ऐकण्यासाठी येतात. आज भेंडवळमध्ये घटमांडणी केली जाईल आणि उद्या १ मे रोजी सूर्योदयापूर्वी भाकित सांगितले जाईल. हे भाकित ऐकण्यासाठी शेतकरी, व्यापारी, राजकीय नेते आणि कार्यकर्ते मोठी गर्दी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटमांडणीचे भाकित बऱ्याच वेळा खरं देखील ठरते. त्यामुळे यंदा देखील नेमकं काय भाकित सांगितले जाते हे ऐकण्यासाठी शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील व्यावसायिकांना उत्सुकता लागली आहे.
मात्र याच घटमांडणीवर आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून ही भाकित जारी जादूटोणा विरोधी कायद्यात बसत नसले तरीही या भाकिताच्या माध्यमातून शेतकरी आणि सामान्य लोकांच्या भावनांशी खेळले जात आहे. शिवाय जर अशा घटना या माध्यमातून कळत असत्या तर जे दहशतवादी हल्ले होत आहे ते का आधी यांना कळत नाही. शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये. या भविष्याला कुठलाही वैधानिक आधार नसून याला बळी पडू नये, असे आवाहन देखील दाभोलकर यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.