बीड जिल्ह्यात रानडुकरांची दहशत; शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी

नेहमी निसर्ग संकटाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, आता रानडुकरांच्या संकटाचा आणि दहशतीचा सामना करावा लागत आहे.
beed news
beed news saam tv
Published On

बीड : नेहमी निसर्ग संकटाचा सामना करणाऱ्या बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, आता रानडुकरांच्या संकटाचा आणि दहशतीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना नुकत्याच झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. मात्र रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घालत उच्छाद सुरू केला आहे. उभ्या पिकांची नासाडी केली जात असून अनेकांवर रानडुकरांनी हल्ला देखील चढावला असल्याने शेतकरी दहशतीत आहे. (Beed News In Marathi )

beed news
चहाची तलप आली अन् अपघात झाला, ट्रॅक्टरने दिली ७ वाहनांना धडक, त्यानंतर...

बीड जिल्ह्यातील शेतकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करत आहे. तर आता या शेतकऱ्याच्या संकटात भर पडली असून जिल्ह्यात रानडुकरांची दहशत पाहायला मिळत आहे. शेतातील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. ऊस, भुईमूग, मका, सोयाबीन, नारळ, आंबा यासह अनेक पिकं नेस्तनाबूत केली जात आहे.

तर दुसरीकडे शेतात काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर हल्ले देखील चढवल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकरी रानडुकरांच्या दहशतीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील बीड, वडवणी, माजलगाव, धारूर, गेवराई, केज यासह जवळपास सर्वच तालुक्यात उच्छाद सुरू आहे.

बीडच्या जरूड गावात मोठ्या प्रमाणावर रानडुकरांनी दहशत माजवली आहे. गावातील अशोक काकडे या शेतकऱ्याच्या फळबागेचे नुकसान केलं आहे. नारळाची जवळपास ५० झाड डुकरांनी मोडून काढली आहे. तर मकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.

त्याचबरोबर आंब्याचे दहा ते पंधरा झाड मोडल्याचा देखील त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे गत २ महिन्यापूर्वी त्यांच्या मुलावर रानडुकरांनी हल्ला केला आणि यामध्ये मुलाला १५ टाके पडले होते. यामुळे शेतात काम कसं करावं ? शेतात जावं की नाही ? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

तर याच गावातील गणेश काकडे, जीवन काकडे यांच्या शेतात देखील रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या ऊसाला, रानडुक्करं भुईसफाट करत आहेत. त्यांनी ३ एकर ऊस लागवड केली आहे. मात्र, या रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने ऊस हाताला लागतो की नाही ? असाच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

तर एकेदिवशी उसामध्ये पाहणी करत असताना चक्क रानडुकरांनी त्यांचा पाठलाग केला, यावेळी ते झाडावर चढून जीव मुठीत धरून बसले, यामुळे त्यांचा जीव वाचला. असल्याचा शेतकरी गणेश काकडे यांनी सांगितले. तर जीवन काकडे या शेतकऱ्यांची देखील हीच परिस्थिती आहे. शेतातील भुईमुग, सोयाबीनमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पिकांची नासाडी केली आहे. यामुळे शासनाने या रानडुकराचा बंदोबस्त करून आम्हाला रानडुक्कर मुक्त करावं, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

beed news
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जूनपासून आतापर्यंत १०२ बळी

तर याप्रकरणावर शेतकरी सुधीर काकडे म्हणाले, अगोदरच शेतकरी एक ना अनेक संकटाचा सामना करतोय. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीज दिली जाते. त्यामुळे आता पिकांना पाणी कसे द्यावे. असा प्रश्न आमच्यासारख्या शेतकऱ्यांकडे आहे. आमच्या परिसरात आतापर्यंत रानडुकानी अनेकांवर हल्ले केले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी (Farmer) जखमी देखील झालेले आहेत.

यामुळे आम्हाला देखील आता शेतामध्ये कसे जावे ? असा प्रश्न आहे. शेतात काम करण्यासाठी घरच्या महिलांना नेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढं आता जगावं कसं ? असा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने रानडुकरांपासून बचावासाठी आम्हा शेतकऱ्यांना आवाजाच्या बंदुका द्याव्यात. त्याचबरोबर शेतीला कंपाउंड मारण्यासाठी अनुदान द्यावं. अशी मागणी सुधीर काकडे यांनी केली आहे.

तर याच गावातील बाळासाहेब काकडे यांचे शेतात शेतीबरोबर शेळी पालनाचा व्यवसाय आहे. मात्र यांना देखील रानडुकराचा सामना करावा लागत आहे. शेळ्या चरण्यासाठी सोडल्या असता यावेळी रानडुकरांनी एका शेळीवर हल्ला चढावला आणि यामध्ये त्यांच्या शेळीला ठार केलं. विशेष म्हणजे त्यांच्यावर देखील रानडुकरांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शेळीच्या शेडकडे धूम ठोकली असता सुदैवाने यामध्ये त्यांचा जीव वाचला. अशी आपबिती शेतकरी बाळासाहेब काकडे यांनी सांगितली.

दरम्यान, जिल्ह्यातील देवडी, जरूड, घाटसावळी, शिवनी, कुटेवाडी, बोरफडी, पिंपळनेर, जवळा, आंबेसावळी, मौज, नाळवंडी यासह अनेक गावांमध्ये रानडुकरांचा उच्छाद सुरू आहे. यामुळे निसर्ग संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढं, आता रानडुकरांची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे आता या शेतकऱ्यांना रानडुकरांच्या दहशतीतून बाहेर काढण्याची गरज आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनासह सरकारने वेळीच पावले उचलावीत. अशीच मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com