बीड : देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंध देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. एकीकडे हा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र गाव खेड्यात (Beed) पायाभूत सुविधांचा वाणवा पाहायला मिळतोय. अजूनही रस्त्याअभावी नागरिकांना जीवघेणा चिखलमय प्रवास करावा लागत आहे. यामुळे निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यावर ग्रामस्थ ठाम झाले आहेत. (Beed Today News)
देशातील प्रत्येक व्यक्तीला पायाभूत सुविधा मिळणे हा त्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गाव खेड्यात पायाभूत सुविधांचा वाणवा पाहायला मिळतोय. बीड (Beed News) जिल्ह्यात अनेक वाड्या, वस्त्या, तांड्यावरील स्वातंत्र्यापासून अद्याप रस्ता पाणी आणि आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्याचबरोबर हजारोंची लोकसंख्या असणाऱ्या गावाला जाणारे रस्ते देखील खड्डेमय आणि चिखलमय झाले आहेत. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत
रस्त्यावरील रहदारी मोठी तरीही..
बीडपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर नाळवंडी गाव आहे. या गावाला जाताना चिंचोली आणि दहिफळ हे दोन गावं लागतात. त्याचबरोबर नाळवंडी परिसरातही इतर दोन गावे आणि 4 तांडे आहेत. त्यामुळे जवळपास 20 ते 25 हजार नागरिक या बीड- नाळवंडी रस्त्यावरून रहदारी करतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामस्थांना खड्डेमय, चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे या रस्त्यावर पंधरा ते वीस खडी क्रेशर आहेत. यामुळे या खडी क्रेशरची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलमय रस्त्याचा सामना करावा लागतोय.
पंधरा मिनिटाचा रस्ता परंतु लागतो एक तास
ग्रामस्थ लक्ष्मण गायकवाड म्हणाले की 10 ते बारा वर्षापासून आमच्या गावाला रस्ता नाही. या रस्त्यावर पाच ते सहा गाव आहेत. दररोज या गावातील मुलांना महाविद्यालयासाठी बीडला यावा लागते. मात्र रस्ता खराब असल्याने अनेकांनी आपले महाविद्यालयात येणे बंद केले आहे. त्याचबरोबर रस्त्यामुळे बस देखील बंद झाली आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना एक ना एक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. केवळ दहा मिनिटाच्या रस्त्यासाठी आम्हाला दीड ते दोन तास घालावा लागतोय. यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याची दखल घेतली नाही, तात्काळ रस्ता केला नाही तर येणाऱ्या निवडणुकींच्या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. असा इशारा ग्रामस्थ लक्ष्मण गायकवाड यांनी दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.