नवनीत तापडिया
Aurangabad News : औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या बायपासचे रुंदीकरण आणि सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी केली होती. मात्र सर्व्हिस रोडऐवजी प्रशासनाने बीड बायपासच्या तीन ठिकाणी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केले होते.
मात्र याचवेळी संपूर्ण उड्डाण पुलाचे काम होत आल्यावर ठेकेदार आणि काम पाहणाऱ्या अभियंताला उड्डाण पुलाची उंची कमी झाल्याचं लक्षात आले, आता ही चूक सुधारण्यासाठी त्यांनी जी शक्कल लढवली आहे ती वाचून तुम्ही देखील डोक्याला हात मारून घ्याल.
संपूर्ण उड्डाण पुलाचे (Flyover) काम होत आल्यावर ठेकेदार आणि काम पाहणाऱ्या अभियंताला उड्डाण पुलाची उंची कमी झाल्याचं लक्षात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आपली चूक लक्षात येताच ठेकदार आणि अभियंता यांनी पुलाखाली सुमारे सात फूट खड्डा खोदला. त्यामुळे उड्डाणपूल पूर्णपणे खचला असून, पावसाळ्यात येथे पाणी जमा होणार आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. रात्री अपरात्री वाहन चालवताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने बऱ्याचदा अपघात देखील घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तसेच उड्डाणपूल बांधल्यानंतर आजूबाजूने खोदलेल्या खड्ड्यांमुळे पूल कमजोर होऊन भविष्यात उड्डाणपूल पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असून अद्यापही ते पूर्णत्वास गेलेले नाही, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि आमची यातून सुटका करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.