Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण झाले. आज समृद्धी महामार्ग सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभराच्या कालावधीत एकूण ३ लाख ५४ हजार २८३ वाहनांनी प्रवास केला. त्यामुळे महिन्याभरात सुमारे २० कोटी २ लाखांची टोल वसुली झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Latest Marathi News)
या महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) वायफड टोलनाक्यावरून ५० हजार २३० वाहने, कोकमठाणवरून ४३ हजार ९७० वाहने, माळीवाडा ४३ हजार २१८, घायगाव-जांबरगाव ३३ हजार ११५ वाहनांनी प्रवास केला. तर सर्वात कमी ३ हजार ५२१ वाहनांनी वेरूळ इंटरचेंजेसवरून प्रवास केल्याचे आकडेवारी समोर आली आहे.
हा महामार्ग सुरू झाल्यापासून नागपूर (Nagpur) ते शिर्डी (Shirdi) प्रवास केवळ सहा तासांवर आला आहे. या महामार्गावर येण्यासाठी आणि मधल्या गावात जाण्यासाठी एकूण १८ इंटरचेंजेस आहेत. असे असले तर दुसरीकडे मात्र या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.
महिनाभरात २६१ अपघात
या महिनाभरात प्राण्यांची धडक, टायर फुटून किंवा नियंत्रण सुटल्याने, चालवताना डुलकी लागल्यामुळे एकूण लहान, मोठे आणि किरकोळ मिळून २६१ अपघात झाले. यात एका अपघातात मायलेकीचा मृत्यू झाला. सोमवार ९ जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या एका अपघातात आठ ते दहा रानडुकरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ही आहेत अपघातांची कारणे
समृद्धी महामार्गावरील अपघातांची कारणे आता समोर येऊ लागली आहेत. वाहने अतिवेगाने चालवणे, अनफिट वाहने, वाहने चालवताना चालकांना डुलकी लागणे, टायर फुटून अपघात होणे आदी कारणे आहेत.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे
समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे बेदरकारपणे वाहने हाकली जातात. याशिवाय अनफिट वाहनेही या महामार्गावरून नेली जातात. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळेही अपघात होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.