अमर घटारे
अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीच्या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून बहुप्रतिक्षेत असलेल्या अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. मुंबईसाठी पहिले विमान याठिकाणाहून टेकऑफ करणार असून यासाठीचे सर्व तिकीट बुकिंग फुल्ल झाली आहे. यामुळे अखेर अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे.
पश्चिम विदर्भातील अमरावती शहर हे महत्त्वाचे विभागीय मुख्यालय आहे. मात्र या मुख्यालयातुन विमान सेवा अद्याप सुरू झालेली नव्हती. अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व अकोला, यवतमाळ जिल्हावासियांची होती. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीने विमानतळाच्या कामाला सुरुवात केली होती. यानंतर विमानतळाचे काम आता पूर्ण झाले आहे.
१६ एप्रिलला मुंबईसाठी टेकऑफ
बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती विमानतळावरून विमान टेकऑफ करण्याचा अखेर मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यानुसार १६ एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. यामुळे अमरावतीकरांची टेकऑफची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. याठिकाणी अलायन्स एअर लाइनवर विमान प्रवासाची जबाबदारी आहे. तारीख निश्चित झाल्यानंतर काही वेळातच अमरावती- मुंबईची तिकिट बुकिंग फुल्ल झाली आहे.
विमानतळाचा लोकार्पण सोहळा
मुंबईसाठी टेकऑफ होण्यापूर्वी १६ तारखेलाच अमरावती विमानतळाचा शानदार पद्धतीने लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे हे लोकार्पण करणार असून अमरावती- मुंबई पहिल्या विमानाने प्रवास करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.