सुशील थोरात
Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिंदे-भाजप सरकारकडून अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने अहमदनगरला अंबिका नगर नाव देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने अहमदनगर महानगरपालिकेला पत्र पाठवून अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवून त्याबाबत अहवाल शासनाला पाठवण्याचे पत्र दिले आहे. मात्र आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न दिवसान दिवस चिघळत चालला आहे.
आता नामांतराच्या मुद्यावरून ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शहरअध्यक्ष संभाजी कदम यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले आहे की, 1985 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची अहमदनगर शहरात सभा झाली होती. त्यावेळी नगर शहराला अंबिका नगर हे नाव स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवले होते. त्याच नावासाठी आम्ही आजही आग्रही असून जर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाची वेळ आली तर अंबिका नगर याच नावाचा ठराव आम्ही करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
महानगरपालिकेवर सध्या ठाकरे गटाची सत्ता असून महापौर याच गटाचा असल्याने या गटाची भूमिका वेगळी असल्याने आता या नामांतराच्या प्रश्नांमध्ये पुन्हा एकदा नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ठाकरे गटाचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांचा नामांतराला विरोध आहे तर महापालिकेत भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात आहे.
विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव द्यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर या नामांतराबाबत आता चांगलेच राजकारण तापले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.