खत विक्रीत अपारदर्शकता; राज्यभरात ८६ विक्रेत्यांचे परवाने निलंबित
५ हजार टन युरिया साठ्यात गोंधळ; काळ्या बाजाराचा संशय
दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईची तयारी; विभागीय निष्काळजीपणाला माफ नाही
शेतकऱ्यांनी अडवणूक झाल्यास तात्काळ तक्रार करावी – कृषी आयुक्तांचे आवाहन
राज्यातील अनेक भागांतून खतांच्या टंचाईच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतानाच, कृषी विभागाने शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या खत विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. अनेक दुकानांत युरिया आणि अन्य खतांचा पुरेसा साठा असतानाही ‘खते संपली आहेत’ असे सांगून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर राज्यभरात तपासणी मोहीम राबवत विभागाने ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित केले असून, आठ दुकानदारांचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत.
कृषी आयुक्त सूरज पांढरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी घेतलेल्या तपासणीत सुमारे ५ हजार टन युरिया खत साठ्यातील तफावत आढळून आली. ही तफावत पाहता, दुकानदारांनी खते लपवून ठेवत ती काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. त्यामुळे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दुकानदारांवर अजूनही अधिक कठोर कारवाई होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईसोबतच, तपासणीत हलगर्जीपणा करणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येणार असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने जाहीर केले आहे. राज्यातील काही भागांत खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामध्ये उस, भात व अन्य खरीप पिकांसाठी युरिया, डीएपी यांसारख्या खतांची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक शेतकरी खते मिळवण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहतात, मात्र ‘साठा संपला’ असे सांगून त्यांना परत पाठवले जाते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर कृषी विभागाने या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालत दुकानदारांवर बडगा उगारला आहे.
कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, जर कोणी खत विक्रेते खते नाकारत असतील किंवा अडवणूक करत असतील तर त्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा. विभाग त्यावर तत्काळ कारवाई करेल, अशी खात्रीही त्यांनी दिली आहे. कृषी विभागाची ही कारवाई इशारा देणारी असून, भविष्यात कोणत्याही खत विक्रेत्याने शेतकऱ्यांशी फसवणूक केल्यास त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी विभाग सर्वतोपरी दक्ष असून, पुढील काळात साठ्याचा अचूक हिशेब, दररोजचा पुरवठा आणि वितरण यावरही डिजिटल माध्यमातून नियंत्रण ठेवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
कृषी विभागाने कोणती कारवाई केली आहे?
राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले असून, ८ दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
कारवाईचे मुख्य कारण काय आहे?
खतांचा साठा असूनही दुकानदारांनी शेतकऱ्यांना खते नाकारून अडवणूक केली आणि काळ्या बाजारात विक्रीचा प्रयत्न केला.
किती युरिया खत साठ्यात तफावत आढळली?
सुमारे ५ हजार टन युरिया साठ्यात तफावत आढळून आली आहे.
शेतकऱ्यांनी अडवणूक झाल्यास काय करावे?
शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, विभाग तत्काळ कारवाई करेल अशी ग्वाही कृषी आयुक्तांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.