Pm Narendra Modi On Electoral Bonds:
देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाचला आहे. येत्या 19 एप्रिल रोजी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातच निवडणुकीत एक मुद्दा सर्वाधिक गाजताना दिसत आहे. तो मुद्दा आहे, इलेक्टोरल बाँड्सचा. देशातील प्रमुख विरोधी पक्ष इलेक्टोरल बाँड्स म्हणजे भाजपने केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप करत आहेत. 'चंदा दो, धंधा लो', असं म्हणत इलेक्टोरल बाँड्सवरून विरोधी पक्षनेते केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत आहेत. याच मुद्द्यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला की, इलेक्टोरल बाँड्सचा निर्णय चुकीचा होता का? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ''इलेक्टोरल बाँड्स होते, त्यामुळे तुम्हाला त्याचा आता हिशोब मिळत आहे. कोणत्या कंपनीने दिले? कसे दिले? म्हणूनच मी म्हणतो, जेव्हा ते (विरोधक) याचा प्रामाणिकपणे विचार करतील, तेव्हा त्यांना पश्चाताप होईल (इलेक्टोरल बाँड्स रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा).
मुलाखतीत पंतप्रधान मोदींना विचारण्यात आले की, तामिळनाडूतील द्रमुक नेत्यांनी सनातनविरोधात अनेक विधाने केली आहेत. यावर तुमचे काय मत आहे? यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ''काँग्रेसला हा प्रश्न विचारला पाहिजे की, सनातन धर्माविरोधात एवढी विष पेरणाऱ्यांसोबत तुम्ही का बसला आहात? सनातनच्या विरोधात द्रमुकचा जन्म झाला असेल, मात्र द्रमुकच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यांच्यावरील लोकांचा हा राग भाजपकडे सकारात्मक मार्गाने वळेल.''
राम मंदिराच्या उद्घटनाला अनेक राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहिले नाही. याच प्रश्नावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'राम मंदिर हे विरोधकांसाठी राजकीय शस्त्र होते, पण आता तो मुद्दा त्यांच्या हाताबाहेर गेला आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.