नाशिक, ता: २५ एप्रिल २०२४
शिरुर लोकसभा मतदार संघातून छगन भुजबळ यांनी लढावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट मिळाले, असा मोठा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला होता. अमोल कोल्हे यांच्या या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून शिरुरचा वाद नेमका काय होता? याबाबत महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
"नाशिकमधून मी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून शिरूर मधून लढता का? असे विचारले होते. शिरूरमध्ये देखील मोठया प्रमाणात ओबीसी समाज आहे, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही," असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडेंना सल्ला..
तसेच "पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देण्याबाबत वक्तव्य केले होते. यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे, सर्वांना सोबत घ्यावं. त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं आहे," असे ते यावेळी म्हणाले.
आज राष्ट्रवादीची बैठक..
नाशिकच्या उमेदवारीबाबत अद्याप महायुतीमधील तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावा केला जात आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी भवनमध्ये ही बैठक असून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.