सचिन गाड, मुंबई|ता. १८ मे २०२४
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून प्रचाराची सांगता आज मुंबईमध्ये होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधताना महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावरुन भाजपवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
"महाराष्ट्रातील सरकार धोका आणि कट रचून बनवले गेले. पंतप्रधान मोदी त्याचे समर्थन करतात. फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्यात आधी कर्नाटकात यांनी हे करून बघितलं. त्यानंतर मणिपूर, गोवा गुजरातमध्ये देखील त्यांनी फोडाफोडीचे राजकारण केले.
"याआधी असे राजकारण कोणत्या पंतप्रधानाने केले नव्हते. विश्वासघाताचे राजकारण सुरू आहे. मोदी सरकारकडून धमकी ब्लॅकमेल आणि आमिष दाखवून विरोधी पक्षाला फोडले जात आहे. मूळ पक्षाचे चिन्ह हिरावून घेतलं जात आहे आणि बंडखोरांना दिलं जात आहे," असा टोलाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी लगावला.
या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी पंतप्रधान येत आहेत. पंतप्रधान घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्मंत्री यांना सोबत घेऊन हुकुमशहीचा प्रचार करत आहेत. मात्र चार जूनला जुमला पर्व संपेल. येत्या ४ जुनपासून अच्छे दिनाची सुरवात होईल, कारण इंडिया आघाडीचं सरकार देशात येत आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.