सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. ३ एप्रिल २०२४
महाविकास आघाडीमध्ये सांगली तसेच भिवंडीच्या जागेवरुन वाद सुरू आहे. अशातच आता शिर्डीमध्येही काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शिर्डीमधून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणाल्या उत्कर्षा रुपवते?
"शिर्डी लोकसभेचा आणि रूपवते कुटुंबाचा इतिहास सर्वांना परिचित आहे. आमची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे उमेदवारी मागितली. 2014 ला वडिलांना उमेदवारी नाकारली. आता मविआने नवीन उमेदवार द्यावा अशी मागणी होती. युवक काँग्रेससाठी मी देशभर काम केलं. पक्षाने महिला आयोगात काम करण्याची संधी दिली. मात्र राजकारणात वारंवार डावललं जातंय," अशी खंत उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केली.
उमेदवारीबाबत फेरविचार करावा..
तसेच "शिर्डीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) दिलेल्या उमेदवाराबद्दल जनतेत रोष आहे. मविआने उमेदवाराबद्दल फेर विचार करावा. जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्याची भिती आहे. काँग्रेसला मतदारसंघ सोडावा यासाठी आग्रही होतो. जागा शिवसेनेला गेली मात्र उमेदवार चुकीचा दिला. सांगलीसाठी प्रयत्न होतो मग शिर्डीसाठी का नाही?" असा सवालही उत्कर्षा रुपवते यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक लढवण्यार ठाम..
"प्रकाश आंबेडकरांची (Praksh Ambedkar) भेट घेऊन माझे विचार मांडले. मात्र अद्याप त्यात पुढे काहीही झाले नाही. मी वंचितमध्ये प्रवेश केलेला नाही. निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. मविआ ने जागेबाबत विचार करावा. ज्या पक्षाचा झेंडा घेऊन हिंडलो त्यांच्याकडून न्याय मिळत नसेल तर नाराजी व्यक्त करावी लागते," असे म्हणत उत्कर्षा रुपवते यांनी थेट बंडाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.