
पावसाळा सुरु झाला की आजारांची मालिका जणू सुरुच होते. पाऊस असताना शहरात विविध भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढताना दिसतायत. अशा परिस्थितीत सतर्क राहणं आणि योग्य तयारी करणे हे आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना डेंग्यूपासून सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.
डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध दोन मुख्य बाबींवर अवलंबून असतो. यामध्ये पहिलं म्हणजे वैयक्तिक संरक्षण तर दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे डासांचं नियंत्रण
वैयक्तिक संरक्षणामध्ये खिडक्यांना जाळ्या लावणं, मच्छरदाणीचा वापर करणं आणि कीटकनाशकांचा वापर करणं यांचा समावेश होतो. यामध्ये हातपाय झाकले जातील असे हलक्या रंगाचे व पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे फायदेशीर ठरतं.
डास नियंत्रणाच्या दृष्टीने, घरात व आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, कुलर व फुलांच्या कुंड्यांतील पाणी नियमितपणे बदलावे. पाण्याचे टाकी व साठवण कंटेनर नीट झाकून ठेवावेत. आसपास जर कारंजे, जलतरण तलाव किंवा कृत्रिम तलाव असतील, तर त्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल आवश्यक आहे जेणेकरून डासांची पैदास होणार नाही.
प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने नियमितपणे फॉगिंग (धुराद्वारे कीटकनाशक फवारणी) करावी. कोणीतरी अलीकडे डेंग्यूग्रस्त क्षेत्रात प्रवास करून आल्यास आणि डेंग्यूची लक्षणे दिसल्यास, त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कोल्हापूरच्या ट्युलिप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितलं की, डेंग्यूची लक्षणं ही फ्लूप्रमाणे असतात. यामध्ये रूग्णाला तीव्र ताप, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या आजूबाजूला वेदना, स्नायू दुखणे आणि त्वचेवर पुरळ येणं या समस्या दिसून येऊ शकतात.
डॉ. पाटील यांनी पुढे सांगितलं की, गंभीर डेंग्यूच्या (डेंग्यू हिमोरेजिक फिव्हर) प्रकारात ताप अचानक कमी होतो, पण याचा अर्थ बरे होणे असा नसतो. अशा स्थितीत रुग्णाला तीव्र अशक्तपणा, पोटदुखी, आणि रक्तयुक्त उलट्यांचे प्रमाण वाढलेले असते. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना डेंग्यू हिमोरेजिक फिव्हर होण्याचा धोका अधिक असतो.
डेंग्यू झालेल्या रुग्णामध्ये आजाराची तीन टप्प्यांमध्ये प्रगती होते. हे टप्पे काय आहेत ते जाणून घेऊया.
सौम्य ताप जाणवतो, जो २ ते ५ दिवस टिकतो. या कालावधीत डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार चालू ठेवावेत आणि शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. काहीवेळा डॉक्टर रक्त तपासणीची सूचना देतात.
गंभीर टप्पा असतो. या टप्प्यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो आणि अवयव कार्यात बिघाड होतो.
ताप आलेल्या ८ ते १० दिवसांनंतर लक्षणांमध्ये सुधारणा दिसून येते.
बहुतेक वेळा डेंग्यू स्वतःहून बरा होतो. पुरेसे द्रवपदार्थ घेणं, वेदनाशामक औषधं आणि पुरेसा आराम हीच उपचारपद्धती असते. डेंग्यूवर ठोस औषध नाही, पण तापासाठी पॅरासिटामॉलचा वापर करता येतो. वैयक्तिक काळजी आणि स्वच्छ परिसर राखल्याने डासांपासून होणारे आजार टाळता येऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.