
ओव्हरथिंकिंग मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे.
भगवद्गीता मनाला शांत करण्याची मार्गदर्शिका आहे.
मन अस्थिर असणे स्वाभाविक आहे, पण त्यावर नियंत्रण येऊ शकते.
आजच्या धकाधकीच्या जगात ओव्हरथिंकिंग आणि निगेटिव्ह विचार हे मानसिक अस्वस्थतेचं मोठं कारण बनलंय. मनात असंख्य विचारांची गर्दी होते, छोटीशी चिंता डोंगराएवढी वाटते आणि आपली झोप, शांती, निर्णयक्षमता या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. पण ही अडचण फक्त आजची नाही. हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनही अशाच विचारांच्या गुंत्यात अडकला होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला तलवार दिली नाही तर त्यावेळी त्याने दिलं ते ज्ञान.
भगवद्गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती तुम्हाला मानसिकरित्या खंबीर करण्यासाठी एक मार्गदर्शिका आहे. मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिचं शहाणपण आजही तितकंच उपयुक्त आहे. खाली दिलेले अध्याय भगवद्गीतेच्या आधाराने तुमच्या मनाला शांत करण्यासाठी निश्चितच मदतीचे ठरू शकतात.
गीतेच्या सहाव्या अध्यायातील ३४व्या श्लोकात अर्जुन कबूल करतो, " मन अस्थिर आहे, चंचल आहे, हट्टी आहे. याला आवर घालणं म्हणजे वाऱ्याला पकडण्यासारखं आहे." आपलं मनसुद्धा असंच असतं. सतत विचार, चिंता, काळजी यामध्ये गुंतलेलं असतं. श्रीकृष्ण अर्जुनच्या या त्रासाला कमी लेखत नाही, उलट तो सांगतो की 'अभ्यास' आणि 'वैराग्य' यांच्या मदतीने मनाला प्रशिक्षित करता येतं.
आपण ओव्हरथिंकिंग करत असू तर स्वतःला दोष देऊ नका. मुळात तो मनाचा स्वभावधर्म आहे. पण ते कायमचं नाही. प्रयत्नांची सातत्यपूर्ण सवय मनाला नियंत्रित करू शकते.
गीतेतील एक महत्त्वाचा आणि अनेकदा गैरसमज होणारा संदेश म्हणजे ‘विरक्ती’. हा शब्द ऐकताच अनेकांना वाटतं की आपल्याला सगळं सोडून द्यावं लागेल. पण श्रीकृष्ण स्पष्ट सांगतो की कर्म करत रहा, पण फळावर हक्क धरू नका.
ओव्हरथिंकिंग अनेकदा याच गोष्टीमुळे होतं, "काय झालं तर?", "लोक काय म्हणतील?", "अपयश आलं तर?" हे सारे विचार भविष्यात अडकून ठेवतात.
कर्म करा, पण निकालाची चिंता करू नका. भविष्यात राहू नका, वर्तमानात जगा. फळाची अपेक्षा ठेवली तर तर चिंता आणि गोंधळ दोन्ही कमी होतील.
श्रीकृष्ण वारंवार ‘कर्मयोग’ म्हणजे निःस्वार्थ कर्म यावर भर देतात. यात मुख्य आहे की, संपूर्ण लक्ष सध्याच्या कामात केंद्रित करणं. ओव्हरथिंकिंग जास्त करून मोकळ्या वेळेत किंवा एकाच वेळी अनेक गोष्टी करताना होतं. पण जेव्हा आपण एखादं काम एकाग्रतेने करतो जसं की, जेवण तयार करणं, लिहिणं, एखादी मीटिंग तेव्हा मनाला भटकायला जागाच उरत नाही.
वर्तमान क्षणात स्वतःला बांधा. ज्या कामात आहात, त्यात मन, शरीर आणि आत्मा एकवटून द्या. हाच ध्यानाचा एक प्रकार आहे आणि ओव्हरथिंकिंगचा मोठा उपाय.
गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो "सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय या सगळ्यांना सारखं समज." आपण मनात प्रत्येक गोष्टीला लेबल लावतो "हे चांगलं", "हे वाईट", "मी कमी आहे", "ते किती पुढे गेलेत". हे विचार आपल्या भावनांमध्ये चढ-उतार निर्माण करतात आणि त्यामुळे विचार अधिकच गुंततात.
प्रत्येक विचारावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्याऐवजी विचारांकडे फक्त निरीक्षक म्हणून पाहा. हा विचार खरंच सत्य आहे का? हे स्वतःला विचारा. विचारांना नाकारू नका, पण त्याचं बळीही होऊ नका.
भगवद्गीतेनुसार मनावर नियंत्रण मिळवण्याचे मार्ग कोणते?
श्रीकृष्णानुसार, 'अभ्यास' (सातत्यपूर्ण सराव) आणि 'वैराग्य' (फळाची अपेक्षा न करणे) यांच्या मदतीने मनाला नियंत्रित करता येते.
विरक्ती म्हणजे काय, ती उदासीनता नाही तर काय?
विरक्ती म्हणजे सर्व कर्मे करणे, पण त्याच्या फळावर आसक्ती न ठेवणे. ती उदासीनता नव्हे, तर निःस्वार्थ कर्म करण्याची भावना आहे.
ओव्हरथिंकिंग टाळण्यासाठी कर्मयोगाचा कसा उपयोग होतो?
एकाग्रतेने वर्तमान कामात गुंतल्यास मनाला भटकण्याची संधी मिळत नाही, ज्यामुळे ओव्हरथिंकिंग कमी होते.
"सुख-दुःख, लाभ-हानी समज" या श्लोकाचा आधुनिक अर्थ काय आहे?
याचा अर्थ आहे की, प्रत्येक घटनेला चांगले-वाईट म्हणून लेबल न लावता तिला समतोल दृष्टिकोनातून पाहावे.
विचारांना कसे निरीक्षण करावे?
विचार आल्यावर त्यांना ताब्यात घेऊ नका, फक्त त्यांचे निरीक्षण करा आणि स्वतःला विचारा – हा विचार खरोखर सत्य आहे का?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.