झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या (Chala Hawa Yeu Dya) माध्यमातून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या चर्चेत आला आहे. गेल्या १० वर्षांपासून कुशल बद्रिके ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. आपल्या दमदार कॉमेडी आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कुशलने खास ‘झी मराठी’ला एक पत्र लिहिले आहे. अभिनेत्याने पत्र वाचतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. (Marathi Actors)
“ ‘चला हवा येऊ द्या’कार्यक्रमाने आयुष्यात आणलेले बदल सांगणारं आणि झी मराठी ला “Thank you” म्हणणारं छोटसं आभार-पत्र.” असं कॅप्शन देत कुशलने व्हिडीओ शेअर केला आहे. कुशल बद्रिकेने पत्रामध्ये लिहिलंय की, “प्रिय झी मराठी, तशी आपली मैत्री ‘हसा चकटफू’पासूनची. पण, ती सर्वार्थाने फुलली या १० वर्षांत. लहानपणी आभाळात उडणारं विमान पाहिलं की वाटायचं मी सुद्धा कधीतरी त्यात बसेन. पण, आता कधी या विमानातून उतरेन असं वाटेपर्यंत तुम्ही हा विमान प्रवास घडवलात.” (Zee Marathi)
पुढे पत्रामध्ये कुशलने लिहिलंय की, “आमच्या सगळ्यांची आमच्या डोळ्यासमोर एकाची दोन घरं आणि घरासमोर दोनाची चार चाकं झाली. नंतर त्याच घरात दोनाचे चार हात झाले. मग काहींनी त्या चाराचे सहा हात केले. तर काहींनी अगदी बारा-बारा हात केले. पण, त्यात तुमचा काही हात नाही त्यामुळे तो विषय सोडा. तुमच्यामुळे आईच्या डोळ्यात बऱ्याचदा अभिमानाने पाणी दाटून आलं. त्याची किंमत मोजता न येणारी आहे. आईच्या पापण्यांच्या शिपल्यांत नंतर त्या पाण्याचे मोती झाले. नंतर मात्र, त्याची किंमत डॉक्टरांकडे मोजावी लागली. पण, ते जाऊद्या…” (Social Media)
“कामाचं प्रेशर आणि लोकांच्या प्रेमाचा गोडवा… दोन्ही गोष्टी रक्तात उतरल्यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगर यांच्याशी आता रक्ताचं नातं जोडलं गेलं आहे. या कार्यक्रमाने जसं जग फिरवलं तसं आपल्या आजूबाजूचं जग ओळखायला ही शिकवलं. कोणाचा का कोंबडा आरवेना… दिवस उगवल्याशी मतलब असणारी मतलबी माणसं…आणि आपल्याच आरवण्याने दिवस उगवला म्हणणारे कोंबडे सुद्धा पाहिले.”
“उगवत्या सुर्याला सलाम ठोकणाऱ्यांच्या दुनियेत रात्रीच्या अंधारात ऊब देणाऱ्या घराची किंमत कळली. आणि एक गोष्ट कळली ती म्हणजे, पेरलेलं आनंदाचं बीज हे एखाद्या वटवृक्षासारखं असतं. त्याच्या पारंब्यांमधून सुद्धा आनंदाचच झाड उगवतं. फक्त जमीन झुकता कामा नये एवढी मात्र काळजी आपण घ्यायला हवी. थँक्यू झी मराठी!” असं भावुक पत्र कुशलने लिहिलं आहे.
अभिनेत्याचं हे भावुक पत्र ऐकून चाहत्यांसह कुशलच्या काही सेलिब्रिटी मित्रांच्याही डोळ्यात पाणी आलंय. ४६ हजारांहून अधिक चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हिडीओवर हजारो लाईक्स मिळाले आहेत. कुशल नक्की ‘चला हवा येऊ द्या’ मधून आता बाहेर पडणार आहे का ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या ९ मार्चपासून सोनी टेलिव्हिजनवर कुशल बद्रिके ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.