मला अनेक वेळा धमक्यांचे फोन यायचे, माझा नंबर ट्रेनमध्ये देखील लावून ठेवला होता. अशी मोठी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. आज साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या विशेष कार्यक्रमात मुलाखत देताना त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी रात्री घरी कुटुंबासोबत असताना मला फोन आला. फोनवरील व्यक्तीने मला 'तु अंजली बोल रही है न? खडसे के खिलाफ लढना छोड दे, नही तो तेरा जीना हराम कर देंगे' अशी धमकी दिली. त्यावेळी मी खूप घाबरले होते. त्यानंतर फोन बंद केल्यावर त्यावर दाऊद २ असं नाव लिहून आलं होतं. त्यानंतर मी तत्कालीन जॉईंट सीपी क्राइम संजय सक्सेना यांना याची माहिती दिली. पण त्याचा तपास आजपर्यंत काय लागला हे मला माहीत नाही. त्यानंतर मला रवी पुजारी गॅंगकडून देखील धमकीचा फोन आला होता. मला सगळ्यात जास्त कोणी छळलं असेल तर खंडसेंनी. माझा नंबर ट्रेनमध्ये देखील लावून ठेवलेला होता. भुसावळवरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये माझ्या नंबर चिटकवून त्याखाली 'खट्टी-मिठ्ठी बाते करने के लीये फोन करे' असं लिहून ठेवलेलं होतं. अत्यंत गलिच्छ फोन मला त्यावेळी यायचे. लोकं घाण-घाण बोलायचे. तेव्हा फार संताप व्हायचा. त्यानंतर मी येणाऱ्या प्रत्येक फोनचे तपशील घ्यायचे आणि पोलिसांना माझा नंबर ट्रेनमधून काढून घ्यायला सांगायचे.
प्रश्न : तुम्ही देत असलेला लढा आम्ही जवळून बघत आहे. तुमच्या कुटुंबात असं कोणी म्हटलं का? की आता बस झालं, आता हे काम थांबव, असं कोणी म्हणालं का?
अंजली दमानिया : नाही, माझ्या पतीने नाही, पण मुलांनी बऱ्याच वेळा हे म्हटलं आहे. मला दोन मुलं आहे. एक मुलगा एक मुलगी. त्यांनी दोघांनी मला थांबवलं होतं. पण माझ्या मिस्टरांनी मला कधीही थांबवलं नाही. त्यांनाही वाटतं माझ्यात जे गट्स आहेत, ते प्रत्येकात नसतात. माझे सगळ्यात स्ट्रॉंग फॉलोअर माझे सासरे होते. २०१९ मध्ये त्यांचं निधन झालं. माझे वडील फार लवकर गेले. पण मला त्यांची उणीव कधीही जाणवली नाही एवढं प्रेम सासऱ्यांनी दिलं, सांभाळून घेतलं. एकदा निखिल वागळे एका चॅनेलवर माझ्याबद्दल काहीतरी बोलले होते. त्यानंतर माझे सासरे खूप अस्वस्थ झाले होते. त्यांनी माझ्याकडून वागळेंचा फोन नंबर घेऊन आमची अंजली अशी नाही हे सांगितलं होतं. मला कायम घरच्यांचा पाठिंबा होता म्हणून मी ही लढाई लढू शकले.
प्रश्न : बीड प्रकरणात तुम्ही बीडची प्रतिमा बिहारपेक्षा वाईट केली. त्यामुळे बीडकर तुमच्यावर नाराज आहेत. त्यावर काय सांगाल?
अंजली दमानिया : हे बोलणारे, तुम्हाला फोन करणारे हे सगळे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असतील. मला बीडचे हजारो लोक येऊन भेटले. मी पाच दिवस तिथे होते. दिवसभर बोलून बोलून थकवा यायचा. मला तिथे होणाऱ्या गुंडगिरीचे इतके फोटो, व्हिडिओ आणि मेसेज यायचे. तिथली सामान्य जनता असं कधीच म्हणणार नाही. उलट मला तिथल्या अनेक लोकांनी म्हंटलं आहे की तुम्ही बीडच अप्रत्यक्षरित्या पालकमंत्रिपद स्वीकारलं आहे. हे प्रकरण तुम्ही लाऊन धरा, बीडला तुमची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.