Women’s World Cup 2025: महिला विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाला लागोपाठ ३ पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लड, ऑस्ट्रेलिया अन् दक्षिण आफ्रिका संघाकडून टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर उपांत्य फेरीचं तिकिट मिळणार की नाही? याची चर्चा सुरू झाली. भारतीय संघाला पाच सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले. लागोपाठ ३ पराभवानंतरही भारतीय संघाकडे उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी कायम आहे. पण त्यासाठी नेमकं गणित कसं असेल... हरमनप्रीत कौरच्या संघाला पुढची रणनिती कशी करावी लागेल? याबाबत जाणून घेऊयात...
रविवारी इंग्लंडविरोधात इंदोरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. इंग्लंडने चार धावांनी भारताचा पराभव करत उपांत्य फेरीचं तिकिट निश्चित केले. पण भारताला अंतिम ४ मध्ये पोहचण्यासाठी आता उर्वरित सामन्यात विजय मिळवावा लागेलच. पण न्यूझीलंडच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. नवी मुंबईमधील डी वाय पाटील स्टेडियममध्ये भारताचे उर्वरित दोन्ही सामने होणार आहेत. त्या सामन्यावर भारताचे उपांत्य फेरीतील भवितव्य अवलंबून असेल.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेटच्या मोबदल्यात २८८ धावांचा डोंगर उभारला. नाइटने ९१ चेंडूत १०९ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये एक षटकार अन् १५ चौकारांचा समावेश होता. २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी शानदार सुरूवात केली. हरमनप्रीत कौर अन् स्मृती मनधाना यांनी वादळी फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. दीप्ति शर्माने शानदार अर्धशतक करत विजयासाठी प्रयत्न केले. पण इतर फलंदाजांनी मोक्याच्या वेळी नांगी टाकली अन् भारताचा फक्त चार धावांनी पराभव झाला. पण या पराभवामुळे उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडियापुढे अडचणी वाढल्या आहेत.
भारताचा पराभव करत इंग्लंडने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आधीच उपांत्य फेरीत पोहोचलेत. भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा पराभव ठरला. भारतासाठी आता उर्वरित दोन्ही सामने 'करो या मर'च्या स्थितीत आहेत.
उपांत्य फेरीतील तीन संघ निश्चित झाले आहे. एका जागेसाठी आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टक्कर होणार आहे. त्यामुळे पुढील सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. २३ तारखेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जास्त आहे.
गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाचे प्रत्येकी चार गुण आहेत, पण भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा थोडा चांगला आहे. भारत न्यूझीलंडविरुद्ध हरला तरी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. भारताला बांगलादेशला हरवावे लागेल. इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करावा लागेल. पण जर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध जिंकला तर चार संघ त्याच दिवशी निश्चित होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.