यंदाच्या आयपीएलची सुरुवात दणक्यात झाली आहे. आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत चारही संघांनी दोनशेच्या वर धावा कुटल्या आहेत. आता आयपीएलमधील सर्वात महत्वाचा रॉजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांमध्ये तगडी लढत होत आहे. गुवाहाटीच्या मैदानात आज, सोमवारी संध्याकाळी हा सामना होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट असून, हवामानाच्या अंदाजानुसार पाऊस पडला तर, सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
युवा खेळाडूंचा भरणा असलेला राजस्थान आणि तगडे आणि अनुभवी खेळाडू असलेला चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात आयपीएलमधील पहिलाच सामना होत आहे. या सामन्यासाठी गुवाहाटीचं मैदान तयार आहे. पण या ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळं राजस्थानचं सराव सत्रही रद्द करण्यात आलं होतं. हा राजस्थानचा दुसरा होम ग्राउंड आहे. पावसामुळं सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. पण खराब हवामानामुळं संपूर्ण सामना रद्द करावा लागेल, अशी सध्या तरी परिस्थिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.
गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट मैदानात आज आयपीएलचा या मोसमातील पहिला सामना होत आहे. राजस्थान आणि चेन्नई आमनेसामने असतील. सोमवारी दिवसा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळं मैदान संपूर्ण झाकून ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना या मैदानात सराव करता आला नाही.
आज, सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होणार आहे. त्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. सात वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत २० ते २५ टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण संध्याकाळी सहापासून ३० ते ४० टक्के पावसाचा अंदाज आहे. सात वाजता पाऊस पडला नाही आणि आधीच्या पावसामुळं मैदान ओलं राहिलं तर, नाणेफेकीला विलंब होऊ शकतो. संध्याकाळी सात ते रात्री ११ पर्यंत २० टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर पावसाची शक्यता १६ टक्क्यांपर्यंत आहे.
संध्याकाळी पाऊस पडला किंवा नाही पडला तरी, हवामान ढगाळ राहील. ढग दाटून आलेले असतील. पण संपूर्ण सामना रद्द होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. राजस्थान-चेन्नई यांच्यातील ४० षटकांचा सामना होईल, अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघांसाठी ही बाब महत्वाची आहे. पाऊस पडला तर त्याचे परिणाम खेळावर होतील. पावसामुळं हवामान दमट राहील. त्यात दव पडला तर, जो संघ टॉस जिंकेल, तो संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळं नाणेफेक जिंकणं महत्वाचे असेल. जर खेळपट्टी बराच वेळ कव्हर केली तर, सामना सुरू झाल्यानंतर वेगवान गोलंदाजांसाठी ती पोषक असेल.
आयपीएल इतिहासात चेन्नई आणि राजस्थान यांच्यात एकूण ३१ सामने झाले आहेत. त्यात १६ सामने चेन्नई आणि १५ सामने राजस्थानने जिंकले आहेत. म्हणजेच या दोन्ही संघांमधील लढत काट्याची होईल यात शंका नाही. जो संघ चांगला खेळ करेल, तो जिंकेल अशी स्थिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.