रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ते अखेरचा वनडे सामना खेळणार?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची दोघांना सन्मानाने निरोप देण्याची तयारी
टी २० आणि कसोटीमधून दोघांनी घेतलाय संन्यास
भारतीय संघाचे दोन शिलेदार, विक्रमांवर विक्रम रचणारे आणि भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचे समजते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांना वनडे क्रिकेटमधूनही 'निरोप' देण्याची तयारी केली जात असल्याचे समजते. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ते अखेरचा सामना खेळू शकतात, असे संकेत आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे भारतीय क्रिकेटला लाभलेले दोन रत्न आहेत. दोघांनीही अलीकडेच टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या दोघांनीही मागील वर्षी टी २० क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या काही दिवस आधीच त्यांनी कसोटी क्रिकेटमधूनही संन्यास घेतला.
सध्या हे दोन्ही दिग्गज खेळाडू वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फॉरमॅटमध्ये हे दोघे खूप काळ खेळण्याची शक्यता कमी आहे. या दोघांना 'निरोप' देण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. बीसीसीआय नव्हे तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंना 'निरोप' देण्याचा विचार करत आहे. भारतीय संघ ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तीन वनडे आणि पाच टी २० क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही भारतीय वनडे संघात खेळणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओंनी सांगितले की दोन्ही दिग्गजांनी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचं कौतुक करण्याची इच्छा बोर्डानं व्यक्त केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी याबाबत सांगितले की, 'ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या भारतीय खेळांडूच्या बाबतीत, विशेषतः त्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत सांगायचे झाले तर, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे असे खेळाडू आहेत की त्यांना आपल्या देशात अखेरचं खेळताना बघणार आहोत.' असं जर होणार असेल तर, आम्ही त्यांना सन्मानाने निरोप देऊ इच्छितो. त्यांच्या जबरदस्त कामगिरीचा गौरव करण्याची आमची इच्छा आहे, असंही ते म्हणाले.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. मात्र, दुसरीकडे दोघांचीही २०२७ पर्यंत खेळण्याची इच्छा असावी. पण तोपर्यंत कोणताही ऑस्ट्रेलिया दौरा नसेल, असेही सांगितले जात आहे. त्यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेनंतर दोन्ही दिग्गजांना सन्मानित करणार असल्याचे कळते. दोन्ही खेळाडू २५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात आपला अखेरचा वनडे सामना खेळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माची वनडे कारकीर्द जबरदस्त आहे. त्याने २७३ वनडे सामन्यांत ४८.७६ च्या सरासरीने १११६८ धावा केल्या आहेत. त्यात ३२ शतके आणि ५८ अर्धशतके आहेत. २६४ ही त्याची वनडेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. आंतरराष्ट्रीय वनडेमधील विश्वविक्रम आहे. त्याने ५६ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्यातील ४२ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावलं आहे.
विराट कोहलीनंही वनडेमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. त्याने २९९ सामन्यांत १४०८५ धावा केल्या आहेत. त्यात ५१ शतके आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ५८.२० च्या सरासरी आणि ९३.४१ च्या स्ट्राइक रेटनं त्यानं धावा केल्या आहेत. ९५ सामन्यांत त्यानं भारतीय संघाचं नेतृत्व केले आहे. त्यातील ६५ सामन्यांत विजय मिळवला आहे.
भारतीय संघाचा तो चौथा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने ७२.६५ च्या सरासरीने ५४४९ धावा केल्या आहेत. तसेच २१ शतके केली आहेत. मात्र, कर्णधार म्हणून त्याला आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये पराभूत झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.