पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका लागला आहे. राज्यसभा खासदार रुक्मिणी उर्फ कोयल मल्लिक यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सभापतींकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. नाराजीनाम्यामागील कारण अधिकृतरित्या समजू शकलेले नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधीच ममतांना हा मोठा झटका मानला जात आहे. मल्लिक यांच्या राजीनाम्यानंतर तृणमूलच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या कमी होऊन ती नऊवर आली आहे. याआधीही पक्षाच्या काही खासदारांनी विविध कारणांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधीच कोयल मल्लिक यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तृणमूल काँग्रेसकडून अद्याप या घडामोडींवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. पक्षाकडून मल्लिक यांच्या जागेवर कुणाला संधी दिली जाणार आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसकडून येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली जाऊ शकते. मल्लिक यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्यसभेच्या सचिवालयाकडून पुढील प्रक्रिया पूर्ण कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कोयल मल्लिक यांचे मूळ नाव हे रुक्मिणी मल्लिक आहे. बंगाली चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नीकटवर्तीय मानले जाणारे आमदार मदन मित्रा देखील बुधवारी विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांच्या गटात सहभागी झाले होते. आम्ही पक्ष सोडला नाही, असा दावा त्यांनी केला होता. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसच्या सर्व राष्ट्रीय आणि संघटनात्मक समित्यांमधील पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. पश्चिम बंगालच्या विधानसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचाही तात्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसच्या गटाला हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. पक्षाचे एकेक नेते राजीनामा देत आहेत. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या गटाची कोणतीही संघटनात्मक जबाबदारी सांभाळणार नाही, असे मित्रा यांनी स्पष्ट केले होते. मात्र, ते आमदार म्हणून कायम राहणार आहेत.
या निर्णयाबाबत आपण ममता बॅनर्जी यांना माहिती दिली होती, असा दावा मदन मित्रा यांनी केला आहे. मित्रा यांच्या या निर्णयाबाबत पक्षात मंगळवार रात्रीपासूनच हालचाली वाढल्या होत्या. मित्रा यांनी बंडखोर आमदार संदीपन साहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. ईडीच्या कारवाईच्या शक्यतेमुळं गट बदलल्याच्या चर्चांचेही मित्रा यांनी खंडन केले आहे. त्यांनी सर्व खापर अभिषेक बॅनर्जी यांच्यावर फोडले. त्यांच्यामुळेच तृणमूल काँग्रेसमध्ये पडझड सुरू असल्याचा आरोप केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.