नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या करीमनगरमध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 'तुम्ही आता अदानी आणि अंबानी यांचं नाव घेणे का बंद केलं. अदानी-अंबानींकडून किती पैसा घेतला? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या करीमनगरमध्ये काँग्रेसवर तुफान टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुम्ही पाहिलं असेल, काँग्रेसच्या राजपुत्राने मागील पाच वर्षांपासून सकाळ झाल्यापासूनच जपमाळ सुरु केली होती. राफेल प्रकरण झालं. त्यानंतर नवी जपमाळ सुरु केली. पाच उद्योजक.. त्यानंतर हळूहळू अदानी-अंबानी यांचं नाव घेऊ लागले. मात्र, आता निवडणूक सुरु झाल्यापासून अदानी-अंबानी यांना शिवीगाळ करणे बंद केलं आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
'राजपुत्राने जाहीर करावं की, अदानी-अंबानींकडून किती पैसे घेतले आहेत. काळं धन किती घेतलं? वाहन भरून नोटा काँग्रेससाठी पोहोचल्या आहेत. काय सौदा झाला? तुम्ही रातोरात अदानी आणि अंबानी यांना शिवीगाळ करणे बंद केलं. यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. मागील पाच वर्षांपासून शिवीगाळ करत होता, त्यानंतर अचानक बंद झालं. याचा अर्थ चोरीचा माल तुम्ही वाहन भरून मिळवलं आहे. आता देशाला उत्तर द्यावे लागेल, असे मोदी म्हणाले.
'तेलंगणामध्ये लोकांनी भारत राष्ट्र समितीवर विश्वास ठेवला. मात्र, बीआरएसने स्वप्न भंग केलं. काँग्रेसचा देखील हाच इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देखील हेच केलं. देश बुडाला पाहिजे, पण यांच्या कुटुंबला काही फरक पडत नाही. कुटुंबाला प्राधान्य, असं यांचं राजकारण आहे. यामुळे यांनी पीव्ही नरसिम्हा राव यांचाही अपमान केला. त्यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव देखील काँग्रेस कार्यालयात ठेवण्यास परवानगी दिली नाही. आमच्या सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले, असे ते पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.