जनगणना २०२६ मध्ये नागरिकांना एकूण ४० प्रश्न विचारले जाणार
प्रश्नांची यादी जाहीर
वैक्तिक प्रश्नांसोबत विचारली जाणार जात
बर्फाच्छादित भागांत १ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रक्रिया होणार
देशातील आगामी जनगणनेच्या प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने नागरिकांकडून विचारल्या जाणाऱ्या ४० प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या जनगणनेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच नागरिकांना त्यांची जात विचारली जाणार आहे. तसेच या यादीत तुम्हाला कौटुंबिक माहिती, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांव्यतिरिक्त, तुम्हाला कोविड लसीकरणाबद्दलही प्रश्न विचारले जातील.
भारताचे रजिस्ट्रार जनरल, मृत्युंजय कुमार नारायण यांच्या आदेशानुसार, लडाख आणि जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बर्फाच्छादित प्रदेशात १ ते ३० सप्टेंबर दरम्यान जनगणना केली जाईल. या संदर्भात या महिन्याच्या सुरुवातीला एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. अधिसूचनेत म्हटले आहे की, घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना सुरू होण्यापूर्वी, १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान स्वयं-गणना करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. तर देशाच्या उर्वरित भागात लोकसंख्या गणना पुढील वर्षी सुरू होईल.
या जनगणनेदरम्यान नागरीकांकडून विविध प्रकारची वैयक्तिक माहिती गोळा केली जाईल. यामध्ये वैवाहिक माहिती, विवाहाच्या वेळी वय, जोडीदाराचे नाव, राष्ट्रीयत्व, धर्म, जात, पालकांचा तपशील, अपंगत्व, मातृभाषा आणि इतर भाषा यांचा समावेश असेल. साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेचेही मूल्यांकन केले जाईल. लोक कोणत्याही शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत का, त्यांची शैक्षणिक पात्रता, आणि त्यांनी कोणत्या शाखेतून शिक्षण घेतलं याबद्दलही विचारले जाईल.
तसेच तुम्ही करत असलेल्या नोकरी संबंधित माहिती देखील गोळा केली जाईल. यामध्ये मागील वर्षातील कंपनी, पगार , व्यवसाय, उद्योग, व्यापार आणि कामगार श्रेणी याबद्दलच्या प्रश्नांचा समावेश असेल. तसेच तुमच्या जन्मस्थानाबद्दल, शेवटच्या निवासस्थानाबद्दल आणि कायमस्वरूपी पत्त्याबद्दलही विचारतील. तसेच विवाह आणि मुलांच्या संख्येबद्दलही प्रश्न विचारले जातील. याशिवाय कोविड-19 लसीकरणाचे ठिकाण, बँक खात्यांची संख्या, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, भारतीय पासपोर्टची माहिती आणि ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध आहे का, याबाबतही प्रश्न असतील.