वक्फ दुरुस्ती विधेयकावरून राज्यसभेत चर्चा सुरू असतानाच, लोकसभेत चीनच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये जुंपली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी चीनच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला.
चीननं भारताच्या ४००० चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे, मात्र सरकार त्यावर कोणतंही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. चीन आमचा ४००० वर्ग किलोमीटर भूभाग ताब्यात घेऊन बसला आहे हे सर्वश्रुत आहे, असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. त्यावर पलटवार करतानाच भाजपनं काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला.
सरकार काय करतंय?
राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. चीनसोबतचे संबंध सुरळीत व्हायला हवेत, पण तत्पूर्वी सीमेवरील परिस्थिती पूर्ववत व्हायला हवी आणि भारताची जमीन परत मिळावी, असं राहुल गांधी म्हणाले.
चीनने ताबा मिळवलेली जमीन परत मिळवण्यासाठी सरकार काय करत आहे, असा सवालही त्यांनी केला. यावेळी राहुल यांनी अलीकडच्याच एका घटनेचा उल्लेख करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र सचिवांना चीनी राजदूतासमवेत केक कापताना बघून आश्चर्य वाटलं. आपले २० जवान शहीद झाले आणि आपण त्यांच्यासोबत केक कापत आहोत, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणावर बोट ठेवलं.
परराष्ट्र धोरणावर शंका
राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरून सरकारवर आरोप केला. सरकारला परराष्ट्र धोरण व्यवस्थितपणे राबवता येत नाही, असं ते म्हणाले. बाहेरील देशांशी संबंध प्रस्थापित करणे हा परराष्ट्र धोरणाचा उद्देश असतो. मात्र, या सरकारनं चीनला ४००० चौरस किलोमीटर जमीन देऊन टाकली. दुसरकडे आपल्या सहकारी देशांनी आपल्यावर २६ टक्के टॅरिफ लावला. त्यामुळं आमचे ऑटोमोबाइल, फार्मास्युटिकल आणि कृषी उद्योग प्रभावित होणार आहेत, याकडंही राहुल यांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी चीनला पत्र लिहले आहे. पण याबाबतची माहिती भारतीय नागरिकांना दिली गेली नाही, उलट स्वतः चीनी राजदूतांनी याबाबत माहिती दिली, असा मुद्दाही राहुल यांनी उपस्थित केला.
भाजपचा प्रतिहल्ला
राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला केला असतानाच, भाजप नेत्यांनीही काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला. काँग्रेस स्वतः चीनसोबत समझोता करत आहे आणि आता सरकारवर आरोप करत सुटले आहेत, असा आरोप अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे यांनी केला.
अक्साई चीनचा भूभाग कुणाच्या कार्यकाळात चीननं ताब्यात घेतला? हिंदी-चीनी भाई-भाईच्या घोषणा कुणी दिल्या? काँग्रेस स्वतः स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खेळ करत आला आहे, अशी विचारणा करतानाच राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून कोणत्या हेतूने पैसे मिळाले होते, असा सवालही अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.