नवी दिल्ली : सैन्यात भरती होऊन देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मंगळवारी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत देशातील तरुण चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करतील. इतकंच नाही तर, चार वर्षांनंतर यामधील सुमारे 80 टक्के सैनिकांना कर्तव्यातून मुक्त केले जाईल. तसेच त्यांना पुढील रोजगाराच्या संधींसाठी सशस्त्र दलांकडून मदतही मिळेल. (Agneepath Recruitment Scheme Latest Marathi News)
त्याचबरोबर उरलेल्या 20 टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याच पुन्हा संधी मिळणार आहे. या योजनेला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे, भारतीय सैन्यात नोकरी करणाऱ्या जवानाचे वय 35 वरून सरासरी 25 वर्षांपर्यंत कमी होईल. ही योजना संरक्षण दलांचा खर्च आणि वय कमी करण्याच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. (What is Agneepath Scheme)
“सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने आज ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अग्निपथ योजनेंतर्गत लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये पहिल्या वर्षी ४५ हजारांहून अधिक तरुणांची भरती होऊ शकते. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली होती.
दरमहा 30 हजार रुपये वेतन मिळणार
'टूर ऑफ ड्यूटी' अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना चार वर्षांमध्ये दरमहा अंदाजे 30,000 इतकं वेतन दिलं जाईल. या वेतनामधून 9000 रुपये सरकार राखून ठेवतील. चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरकार हे पैसे देणार आहे. याचा फायदा असा होईल की 21 वर्षांच्या तरुणांसाठी 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेची व्यवस्था केली जाईल, जेव्हा सैन्यात भरती झालेला तरुण जवान 4 वर्षे सेवा केल्यानंतर परत येईल. तेव्हा त्याला ही रक्कम दिली जाईल.
बिपीन रावत यांची कल्पना सत्यात उतरली!
विशेष बाब म्हणजे,अग्निपथ योजनेची संकल्पना हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालेल्या दिवंगत बिपिन रावत यांनी मांडली होती. तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत मृत्यूनंतर ही संकल्पना आता सत्यात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या योजनेची ब्लू प्रिंट तत्कालीन 2020 मध्ये तयार साकारण्यात आलेली.
सैनिकांची कमतरता भासू नये, तसंच सैन्याच्या पेन्शनवरील खर्च कमी करावा आणि तरुणांना सैन्यात भरती होण्यास प्रोत्साहिक करावं, हा या संकल्पनेमागचं प्रमुख हेतू होता. दरम्यान आता संरक्षणं मंत्र्यांनी घोषणा केल्यानं देशातील तरुण या योजनेला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.