सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2026 timetable : लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आषाढात (Ashadhi Wari 2026 ) पंढरपूरला जातात. टाळ- मृदुंग,भगवी पताका आणि मुखी विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा विठूरायांच्या दर्शनासाठी जातो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत जातात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माऊलीच्या पालखीचे प्रस्थान कधी होणार? कुठे कुठे मुक्काम असेल? रिंगण कुठे असेल? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता माऊलींची पालखी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आळंदीहून प्रस्थान करणार आहे. तर २४ जुलै रोजी हे वैष्णवांचे रिंगण पंढरपूर नगरीत दाखल होईल. दरम्यान यंदाच्या १७ दिवसांच्या या पायी वारीत भक्तिभावाचा परमोच्च बिंदू ठरणारी ४ गोल आणि ३ उभी रिंगणे होणार आहेत. मुख्य आषाढी एकादशीचा सोहळा २५ जुलै रोजी साजरा होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली आहे.
माऊलींच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतचं होणार, देवस्थानकडून वेळापत्रक जाहीर
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम कुठं होणार? याबाबत बराच गोंधळ उडल्यानंतर अखेर आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं होणार आहे. आज देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करुन, परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.
पालखी सोहळ्याचा मार्गक्रम पाहता, ८ जुलैला प्रस्थान झाल्यावर ९ आणि १० जुलैला पुणे शहरात मुक्काम असेल. त्यानंतर ११ व १२ जुलैला पालखी सासवडमध्ये विसावेल. १३ जुलैला जेजुरी आणि १४ जुलैला वाल्हे येथे मुक्काम करून १५ जुलैला नीरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे मार्गस्थ होईल. १६ जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पार पडेल आणि तरडगाव येथे मुक्काम होईल. वारीचा पुढचा प्रवास १७ जुलैला फलटण, १८ जुलैला बरड आणि १९ जुलैला नातेपुते असा असेल. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण झाल्यानंतर माळशिरसमध्ये मुक्काम होईल.
२१ जुलैला खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण आणि वेळापूर येथे मुक्काम, तर २२ जुलैला ठाकुरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे ऐतिहासिक 'बंधू भेट' होऊन वारी भंडीशेगावला पोहोचेल. २३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल व उभे रिंगण अशा दोन्ही सोहळ्यांचा आनंद घेत पालखी वाखरी येथे विसावेल. २४ जुलैला आषाढ दशमीच्या मुहूर्तावर सर्व संतांच्या पालख्यांसह माउलींची पालखी पंढरपुरात प्रवेश करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.