मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे.
पुढील ३ तासांत अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता
मुंबई, उपनगर आणि परिसराला मागील २ दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसासोबतच ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे.
आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी समुद्रात ४.२६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून 'हायटाईड'चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः मच्छिमारांना किनारपट्टीवर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या २४ तासांत सांताक्रुझ आणि कुलाबा परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली असली, तरीही शहरात कुठेही पाणी साचल्याची मोठी तक्रार नाही.
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी 'लोकल रेल्वे' (सेंट्रल आणि वेस्टर्न दोन्ही लाईन्स) आणि रस्त्यावरील वाहतूक सध्या संथ गतीने पण सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.