संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण: संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा एल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त केल्याने राज्य सरकारकने 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
यापूर्वीही ठाणे पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार 12 मे, 22 मे आणि 2 जून रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. 9 जून रोजी जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीत सर्व महानगरपालिका, एमआयडीसी आणि अन्य प्राधिकरणांनी दररोज 20 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार केडीएमसीच्या बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 12 व 17 जून रोजी डोंबिवली पूर्वेतील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग, 13 व 18 जून रोजी कल्याण पूर्वेतील ‘ड’ व ‘जे’ प्रभाग तसेच कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल, पारनाका आणि सुभाष मैदान परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. 14 व 19 जून रोजी डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग, 15 व 20 जून रोजी कल्याण पश्चिमेतील ‘ब’ आणि ‘क’ प्रभाग, तर 16 व 21 जून रोजी मोहिली जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या कल्याण ग्रामीण भागासह योगिधाम, मिलिंद नगर, बिर्ला कॉलेज, चिकनघर, मुरबाड रोड आणि वालधुनी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
संबंधित भागांचा पाणीपुरवठा संबंधित दिवशी रात्री 12 वाजल्यापासून पुढील 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.