पुणे : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडून सातत्यानं बोललं जातं. तसंच महाविकास आघाडीचं (MahaVikas Aghadi) हे सरकार कोसळेल आणि त्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून तारखांवर तारखा दिल्या जात असतानाच, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असते तर महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती का, असा प्रश्न भाजपचे (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी विचारला. त्यावर विलासराव असते तर, १०० टक्के महाविकास आघाडी झाली असती, किंबहुना ते असते तर कधी-कधी असं वाटतं की आघाडीचीच सत्ता आली असती, असं सांगतानाच, शिवसेनेची गरज पडली नसती, असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं. सकाळ डिजिटलतर्फे आयोजित सरकारनामा ओपन माइक चॅलेंज (Sarkarnama Open Mic Challenge) या अराजकीय कार्यक्रमात ते बोलत होते. (congress mla dhiraj deshmukh s big statement about maha vikas aghadi at sarkarnama open mic challenge)
हे देखील पाहा -
'सरकारनामा हिट वेव्ह,' 'सरकारनामा फेस ऑफ' या रंगतदार फेरीत राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel), काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना सर्वच सहभागी नेत्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. राजकारणापलीकडचा हा रंगतदार 'सामना' या कार्यक्रमात पाहायला मिळाला. यावेळी राजकारणाव्यतिरिक्त विविध विषयांवरही गप्पा रंगल्या. राज्यातील तरूण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र कसा आहे? पत्रकारांच्या भूमिकेतून नेत्यांनीच नेत्यांना विचारलेले तिखट प्रश्न आणि त्याला दिलेली उत्तरे यामुळे हा कार्यक्रम चांगलाच रंगला.
विलासरावांकडून 'ही' शिकवण मिळाली
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यातील असा कोणता गुण आहे, की तो तुम्ही आत्मसात करू शकत नाही आणि दुसरा असा कोणता गुण आहे, जो राजकारणात येताना तुम्ही पहिल्यापासूनच आत्मसात केला आहे, असा प्रश्न राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धीरज यांना केला. त्यावर विलासराव हे शांत आणि संयमी होते, त्यांना राग येत नव्हता. ते आजच्या पिढीला सहज जमेल असं वाटत नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारखा गुण म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. राजकारणात काम करत असताना डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवून काम करावे लागते ही शिकवण मला त्यांच्याकडून मिळाली, असे धीरज म्हणाले.
'माझ्यातील क्षमता तपासून पाहावी म्हणून राजकारणात...'
विलासराव यांच्यानंतर मोठी जबाबदारी अमित देशमुख यांच्या खांद्यावर होती. त्यानंतर तुमचा भाऊ अभिनेता रितेश देशमुख हे त्यांच्या क्षेत्रात उत्तम आहेत. अशा दोघांमध्ये आपण स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आपला मार्ग प्रशस्त कसा केला, असा प्रश्न श्रीकांत शिंदेंनी धीरज यांना केला. त्यावर राजकारणात येण्याचा माझा विचार लहानपणापासून नव्हता. व्यवसाय करण्याची इच्छा होती. लोकांनी स्वीकारल्यामुळे मी राजकारणात आलो आणि लोकांनीही प्रतिसाद दिला. तुमच्यामध्ये आम्ही ती क्षमता पाहतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तीच माझ्यातील क्षमता एकदा तपासून पाहावी म्हणून माझा हा राजकारणातील प्रवास सुरू झाला आणि आतापर्यंत चांगलं चाललं आहे, असं धीरज म्हणाले.
विलासराव असते तर...?
विलासराव हे शिवसेना आणि भाजपविरोधात होते. आज विलासराव असते तर, महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती का, असा प्रश्न आमदार फुके यांनी विचारला. त्यावर विलासराव असते तर, महाविकास आघाडी १०० टक्के अस्तित्वात आली असती. पण कधी कधी आम्हाला वाटतं की, सत्ता ही आघाडीचीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) आली असती, असं उत्तर देतानाच, शिवसेनेची गरज पडली नसती, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचवले. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दरम्यान, खासदार जलील यांनी राजकारणाविषयी प्रश्न न विचारता कौटुंबिक प्रश्न विचारला. जेनिलिया डिसूजा या अभिनेत्री म्हणून चांगल्या की, भावाची पत्नी म्हणून चांगली आहे, असं जलील यांनी विचारलं. त्यावर माझी वहिनी म्हणून ती सगळ्यात चांगली आहे, असं धीरज यांनी सांगितलं.
Edited By - Nandkumar Joshi
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.