Mumbai News : राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पुन्हा पुन्हा सुरु असलेल्या नैसर्गिक संकटामुळे बळाराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकारकडे लागल्या आहे.
सरकार या संकटातून सावरण्यासाठी काही मदत करेल का, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे. मात्र आपल्याला कुणीच वाली उरला नाही अशी भावना शेतकऱ्यांची असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
आधीची नुकसानभरपाईची मदत सरकारी कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेचा ससेमिरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे या अरिष्टात सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत नाही. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे, अशा शब्दात सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
राजकीय उखाळ्य़ा-पाखाळ्या काढण्यात सरकारचा वेळ जातो
शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सरकारने करायला हवे, नव्हे सरकारचे ते कर्तव्यच आहे. मात्र राजकीय उखाळ्य़ा-पाखाळ्या काढण्यात आणि विरोधकांना कोणत्या गुह्यात गुंतवून तुरुंगात धाडता येईल, याविषयीची कारस्थाने आणि खलबते करण्यातच या सरकारचा निम्म्याहून अधिक वेळ जातो. सुडाच्या राजकारणातच रमलेल्या राज्यकर्त्यांकडे शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी, त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.