महापालिका निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला
राज्यभरात मनसेचे फक्त १३ नगरसेवक विजयी
अमित ठाकरे यांची फेसबुकवर पोस्ट करत खंत व्यक्त केली
मराठी माणसासाठी लढा सुरूच राहील असा शब्द त्यांनी दिला
मुंबईसह राज्यातील २९ महानगर पालिकांचा निकाल शुक्रवारी लागला. या निकालामध्ये मनसेला मोठा धक्का बसला. ठाकरे बंधू एकत्र येऊन देखील मनसेला या निवडणुकीमध्ये अवघ्या १३ उमेदवार निवडून आणण्यात यश आले. मुंबईमध्ये मनसेचे फक्त ६ नगरसेवक विजयी झाले. या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. राज ठाकरेंपाठोपाठ आता मनसे नेत अमित ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत खंत व्यक्त केली. 'मराठी'आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी महापालिका निकालानंतर फेसबुकवर पोस्ट केली. मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील! या आशयाखाली त्यांनी ही पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये अमित ठाकरे यांनी लिहिले की, 'निकाल काहीही असो... खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका 'बटणापुरतं' किंवा 'मतापुरतं' कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.'
अमित ठाकरे यांनी पुढे मराठी माणसाला एकटं पडू देणा नाही असा शब्द दिला आहे. त्यांनी असेही सांगितले की, 'तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला... सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. 'महाराष्ट्र' आणि 'मराठी माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील. खचून जाऊ नका... 'मराठी'ला आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही... हा शब्द आहे ठाकरेंचा!'
राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अपेक्षित निकाल न लागल्याने दु:ख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.