bmc water supply news today live Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Cut : मोठी बातमी! मुंबईत पाणीकपातीचा निर्णय; 'या' तारखेपासून १० टक्के पाणीकपात लागू

Satish Daud

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. हीच बाब लक्षात घेता महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

मुंबई महानगरात गुरूवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं महापालिकेने म्हटले आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील पाणीसाठा अत्यंत झपाट्याने कमी झाला आहे. याचे कारण म्हणजे २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने समाधानकारक पाऊस झाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे.

आज, दिनांक २५ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. एवढेच नव्हे तर, भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे.

याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे, यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, ही देखील सकारात्मक बाब आहे.

असे असले तरी, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सदर पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही ५ टक्के आणि १० टक्के कपात अनुक्रमे नियत दिनांकापासून लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.

मुंबई महापालिकेच्या नागरिकांना काय सूचना?

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाणी बचतीची योग्य सवय लावून घ्यावी. आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. स्नान करताना शॉवरचा उपयोग टाळावा. बादलीत पाणी घेऊन आंघोळ करावी. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे, अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत.

घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो, असंही महापालिकेने म्हटलं आहे.

नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करण्यासाठी बाजारात विशेष तोट्या उपलब्ध असतात त्या खरेदी करून सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा. उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी, अशा सूचनाही महापालिकेने केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT