मुंबई : अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परिणामी राज्यातील काही भागात सुरू झालेली थंडी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गायब झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची खरीप हंमातील पीके काढणीस आलेली असताना, दुसरीकडे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)
अगदी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात थंडीचा गारठा कमी
नोव्हेंबर महिन्यांच्या सुरूवातीला राज्यातील काही भागात (Weather Updates) थंडी पडण्यास सुरूवात झाली होती. हवेतील गारठा वाढल्याने आता कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज शेतकरी लावत होते. मात्र, महिन्याच्या सुरूवातीलाच पडलेली थंडी शेवटच्या आठवड्यात गायब झाली.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे अचानक थंडी कमी झाली आणि उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. अशात आता राज्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन खरीपाची पिके काढणीला आली असताना, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
का पडतोय पाऊस?
मागच्या काही दोन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. उद्या हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.